
डावखुरा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने (११४ चेंडूंत ४० धावा तसेच ३३ धावांत ४ बळी) पुनरागमनीय लढतीत अष्टपैलू चमक दाखवली. त्यामुळे भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आघाडीच्या दिशेने वाटचाल केली आहे. चितगांव येथे सुरू असलेल्या उभय संघांतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने पहिल्या डावात ८ बाद १३३ धावा केल्या असून त्यांना फॉलोऑन वाचवण्यासाठी अद्याप ७२ धावांची आवश्यकता आहे. तसेच ते भारताच्या ४०४ धावांच्या प्रत्युत्तरात एकंदर २७१ धावांनी पिछाडीवर आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मेहदी हसन मिराज १६, तर एबादत होसेन १३ धावांवर खेळत होता.
कुलदीपने मुशफिकूर रहिम, शाकिब अल हसन यांसारखे महत्त्वाचे बळी मिळवले. भारताकडून कुलदीपने चार, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तीन व उमेश यादवने एक बळी मिळवला आहे. तत्पूर्वी, बुधवारच्या ६ बाद २७८ धावांवरून पुढे खेळताना भारताने श्रेयस अय्यरला (८६) लवकर गमावले. बुधवारी ८२ धावांवर नाबाद असणाऱ्या श्रेयसला फक्त चार धावांची भर घालता आली. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यांनी आठव्या गड्यासाठी ९२ धावांची भर घातली. अश्विनने १३वे अर्धशतक झळकावताना ५८ धावा केल्या. तर कुलदीपनेसुद्धा कारकीर्दीत प्रथमच ४० धावा केल्या. त्यामुळे भारताने ४०० धावांचा टप्पा गाठला. बांगलादेशकडून तैजूल इस्लाम आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले. कुलदीप यादव तब्बल २२ महिन्यांनंतर कसोटी सामना खेळत आहे. फेब्रुवारी २०२१मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध तो अखेरची कसोटी खेळला होता.