
क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला भारतरत्न सचिन तेंडुलकरविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरकडे भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी केली होती. यासाठी ३० ऑगस्टपर्यंतची मुदत त्यांनी दिली होती. मात्र, तोपर्यंत सचिन तेंडुलकरकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे आता बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज(३१ ऑगस्ट) पहाटे सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू यांनी स्वत: आंदोलनात सहभागी होतं सचिनचा निषेध केला.
बच्चू कडूंनी काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरने केलेल्या एका जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. ऑनलाईन गेमिंगच्या या जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरला जे लोक मानतात त्या तरुणाईवर याचा परिणाम होत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला होता. त्यामुळे सचिन तेंडुलकरनं एकतर या जाहिराती सोडाव्यात किंवा त्याला देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार तरी परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. या मागणीसाठी आज प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर जमले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत बच्चू कडू व काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, बच्चू कडूंनी आपल्या मागणीसाठी सर्व गणेश मंडळांच्या मंडपांबाहेर 'सचिन तेंडुलकर दानपेटी' ठेवण्याचा निर्णय सगळीकडे जाहीर केला आहे. "सचिन तेंडुलकरचे खूप चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केल्यामुळे त्याचा परिणाम जनमानसावर पडत आहेत. कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. त्यांनी जर ही जाहिरात सोडली नाही, तर आम्ही प्रत्येक गणपती मंडळासमोर दानपेटी ठेवणार आहोत. आम्ही गणपतीलाही प्रार्थना करणार आहोत की सचिन तेंडुलकर यांना चांगली बुद्धी द्यावी", असं बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू पुढे बोलाताना म्हणाले की, "त्यांनी जाहिरात सोडावी किंवा भारतरत्न तरी परत करावा. त्यांना जर भारतरत्न दिला नसता, तर आम्ही काही बोललो नसतो. पण ते देशाचे भारतरत्न आहेत. अश्या जाहिराती करायला इतर सेलिब्रिटी आहेत आणि ती लोक भारतरत्न देखील नाहीत. भारतरत्न भगतसिंगांना मिळाला नाही, आण्णाभाऊ साठेंना मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. फक्त सचिन तेंडुलकर हा आमचा विषय नाही. भारतरत्न हा आमचा विषय आहे. भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये. त्यांना वकिलांमार्फत नोटीस देखील पाठवली आहे", असंही ते म्हणाले.