
पॅरिस : ऑगस्ट २०२६ मधील बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्लीत होणार असल्याची घोषणा जागतिक बॅडमिंटन महासंघाने सोमवारी केली.
तब्बल १७ वर्षांनंतर भारताला स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यापूर्वी २००९ साली हैदराबाद येथे ही स्पर्धा पार पडली होती.
पॅरिसमध्ये पार पडलेल्या २०२५ च्या स्पर्धेच्या समारोप समारंभात ही घोषणा करण्यात आली. यावेळी जागतिक बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष खुनिंग पटामा लीस्वाद्त्राकुल, फ्रेंच बॅडमिंटन महासंघाचे प्रमुख फ्रँक लॉरेंट आणि भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस संजय मिश्रा यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. ८ वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा आशिया खंडात होणार आहे. यापूर्वी चीनच्या नानजिंग शहरात २०१८ मध्ये ही स्पर्धा पार पडली होती. भारत पुन्हा एकदा ही स्पर्धा आयोजित करत आहे.
पॅरिसप्रमाणेच भारतही या स्पर्धेच दर्जेदार आयोजन करेल याची आम्ही खात्री देतो. जागतिक बॅडमिंटनचे आजी, माजी खेळाडू, संबंधित व्यक्ती यांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
- संजय मिश्रा, सरचिटणीस, भारतीय बॅडमिंटन संघटना