
बंगळुरू : आयपीएलचे जेतेपद मिळवल्यानंतर बंगळुरूत बुधवारी आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र यासाठी स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दी जमल्याने ११ जणांचा चेंगराचेंगरीत बळी गेला. तसेच २५ ते ३० चाहते जखमी झाले. त्यामुळे बंगळुरू प्रशासनासह संघ व्यवस्थापनावरही क्रीडाविश्वातून टीका करण्यात येत आहे.
भारताचा प्रशिक्षक गंभीरने मिरवणूक काढण्याच्या प्रथेलाच विरोध केला आहे. “मला मिरवणूक वगैरे प्रकार आवडत नाही. २००७मध्ये जेव्हा भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता. त्यावेळेसही मी ओपन बसमधून मिरवणुकीसाठी फारसा उत्साही नव्हतो. मिरवणुकीपेक्षा चाहत्यांचा जीव मोलाचा आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य नसल्याचे कर्नाटक पोलिसांनी सांगितले होते. तरीही असे घडणे फारच क्लेशदायी आहे,” असे गंभीर म्हणाला.
“एकीकडे संघ १८ वर्षांनी प्रतिष्ठेची आयपीएल स्पर्धा जिंकला आहे. मात्र त्याचवेळी चाहत्यांचा मृत्यू झाल्याने ही मिरवणूक सर्वांनाच स्मरणात राहील. क्रिकेटसाठीसुद्धा एकप्रकारे हा काळा दिवस ठरला. बंगळुरूचे चाहते आरसीबी आणि विराट कोहलीसाठी वेडे आहेत. मात्र त्यांनी स्वत: काळजी घेतली पाहिजे होती. यासाठी आरसीबी मॅनेंजमेंट किंवा शासनाला पूर्णपणे दोष देता येणार नाही,” असे भारताचे माजी कर्णधार कपिल देव म्हणाले.
दरम्यान, बंगळुरू संघाकडून मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करतानाच सर्वांच्या दुखात आपण सहभागी असल्याचे सांगितले.
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने यंदा संपूर्ण हंगामात जेतेपदाच्या प्रबळ दावेदारासारखा खेळ केला. त्यांनी संपूर्ण हंगामात प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात एकही लढत गमावली नाही. त्याशिवाय अनेकदा सामन्यात पिछाडीवर असतानाही दडपणाखाली कामगिरी उंचावून संघाला मार्ग दाखवला. त्यामुळेच त्यांनी याचा जल्लोष केला, मात्र यास गालबोट लागले.