खेलो इंडिया खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रच्या दोन्ही संघांने पटकाविले सुवर्णपदक

महाराष्ट्राला पदक तालिकेत अव्वल ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.
खेलो इंडिया खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रच्या दोन्ही संघांने पटकाविले सुवर्णपदक

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे झालेल्या खो-खो स्पर्धेत शेवटच्या दिवशी अंतिम सामन्यात सोमवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी कमालीचा खेळ करत सुवर्णपदक पटकाविले. महाराष्ट्राला पदक तालिकेत अव्वल ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.

मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओरिसावर २१-२० (८-६, ७-९, व जादा डावात ६-५) असा अतिशय अटीतटीच्या सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून ओरिसाने संरक्षण घेत महाराष्ट्राला आव्हान दिले; मात्र पहिल्या डावात त्यांचा होरा चुकवत महाराष्ट्राने घेतलेली दोन गुणांची आघाडी सुखावणारी होती; मात्र या आनंदावर ओरिसाच्या खेळाडूंनी जोरदार आक्रमण करत बरोबरी साधली. त्यावेळी मात्र महाराष्ट्र खो-खोचे सर्वेसर्वा डॉ. चंद्रजीत जाधव यांनी प्रशिक्षकांपर्यंत कानमंत्र देत जोरदार लढत देण्याचा सल्ला दिला. पुन्हा एकदा गुणफलकावर सर्वांची नजर खिळून होती मात्र महाराष्ट्राला आक्रमणात फक्त ६ गुणांचीच कमाई करता आली.

आता सारी भिस्त संरक्षकांवरच होती. पहिली तुकडी ३:५० मि. गारद झाल्यावर मात्र प्रेक्षकांच्या तोंडचे पाणीच पळाले. जान्हवी पेठे व प्रीती काळे यांनी ओरिसाच्या मनसुब्यांना सुरुंग लावत विजयात मोठी कामगिरी बजावली. या सामन्यात महाराष्ट्राच्या कर्णधार जान्हवी पेठे (१:३५, २:२० मि. संरक्षण ), प्रीती काळे (१:४५, २:४० मि. संरक्षण व २ गुण ), संपदा मोरे (१:३०, १:४० मि. संरक्षण व ६ गुण) व वृषाली भोये (४ गुण) यांनी विजयात सुवर्ण कामगिरीची नोंद केली. तर ओरिसाच्या अर्चना (२:१५ १:४५ मि. संरक्षण व २ गुण), स्मरणिका साहू ( १:३०, २:१० मि. संरक्षण व ७ गुण) व अनन्या प्रधान ( १:४५, १:३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी परभवातही जोरदार कामगिरीची नोंद केली.

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओरिसाचा १४-११ असा एक डाव ३ गनांनी दणदणीत पराभव केला व सुवर्णपदकावर नाव कोरले. या सामन्यात महाराष्ट्राच्या शुभम थोरात (२ मि. संरक्षण व २ गुण), नरेंद्र कातकडे (२ मि. संरक्षण व २ गुण), ऋषीकेश शिंदे (२ मि. संरक्षण) व रामजी कश्यप (१:५० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजयश्रीत दमदार कमगिरिची नोंद केली तर ओरिसाच्या टी. जगन्नाथ दास (१:१० संरक्षण व ६ गुण) व संजीतने दिलेली जोरदार लढत अपयशी ठरली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in