मुंबई : सीएटतर्फे मंगळवारी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा व एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच वार्षिक पुरस्कार सोहळ्यात भारताचे माजी क्रिकेटपटू बी. एस. चंद्रशेखर व वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात रोहितने २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचे श्रेय माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिले. रोहितने जाणीवपूवर्क सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे नाव घेणे टाळले. रोहितच्या नेतृत्वात भारताने २०२४मध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मग द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ समाप्त झाला. तेव्हा गंभीर यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले. गंभीरच्या कार्यकाळात भारताने मार्च २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मात्र यासाठी संघबांधणीची सुरुवात २०२३च्या विश्वचषकापासूनच झाली होती, असे रोहित म्हणाला.
भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार असून उभय संघांत १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. मात्र ३८ वर्षीय रोहित शर्माकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. रोहित व विराट कोहली या मालिकेद्वारे जवळपास सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहेत. परंतु रोहित मात्र यावेळी फक्त खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळेच रोहित व गंभीर यांच्यात सारे काही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे.