
दुबई : आयसीसीच्या स्पर्धेमध्ये विकेट मिळवणे हे माझे लक्ष्य असते, इकोनॉमी रेटकडे मी पाहत नसल्याचे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी म्हणाला. गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या लढतीत भारताने बांगलादेशला धूळ चारली. दुखापतीतून सावरलेल्या शमीने या सामन्यात ५ विकेट घेण्याची कामगिरी केली. शमी हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेट घेणारा भारतीय आणि जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये माझ्या गोलंदाजीवर फटका बसला तरी चालेल, परंतु मला विकेट हवी असते. माझ्या संघासाठी ते फायदेशीर असते. मी नेहमीच असा विचार करत असतो, असे शमी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
मैदानात सर्वस्व देण्याचा माझा प्रयत्न असतो. दुखापतीमुळे मी गेले १४ महिने खेळापासून दूर आहे. मी माझे लक्ष्य गाठण्यासाठी भुकेला आहे. पुन्हा फॉर्म गवसण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. तुम्ही भुकेले असायला हवे, असे शमी म्हणाला.
शमीने वनडे क्रिकेटमध्ये सहावेळा पाच बळी मिळवत भारतासाठी सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.
गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत भारताने शेजारील बांगलादेशला धूळ चारली. या सामन्यात भारताने ६ गडी आणि २१ चेंडू राखून विजय मिळवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यात बांगलादेशच्या ५ फलंदाजांना माघारी धाडले.