ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांची एकमेकांशी तुलना करणे योग्य नाही, असे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.
दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यात सर्वश्रेष्ठ यष्टिरक्षक फलंदाज कोण आहे? असा प्रश्न यावर रोहितला विचारला असता रोहित म्हणाला की, दोन्ही खेळाडूंची शैली वेगवेगळी असल्याने त्या दोघांची तुलना करणे योग्य नाही.
त्याने स्पष्ट केले की, ऋषभ पंतची यष्टीरक्षणाची शैली उत्तम आहे आणि तो एक धडाकेबाज फलंदाज आहे. समोर दिग्गज गोलंदाज असला तरी पंत त्याच्या अनोख्या अंदाजात खेळतो. दुसरीकडे, दिनेश कार्तिककडे मोठा अनुभव आहे. फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते आणि अनेक सामन्यात त्याने फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. शिवाय यष्टिरक्षणातही तो दर्जेदार आहे.
रोहित म्हणाला की, दोन्हीही खेळाडूंचे भारतीय संघात वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. त्यामुळे दोघांची तुलना करणे बिलकूल योग्य नाही.
ऋषभ पंतमुळे दिनेश कार्तिकला संघात फारशी संधी मिळू शकलेली नव्हती. टीम इंडियातील त्याची कारकीर्द जवळपास संपल्यासारखी होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघात दिनेश कार्तिकला संधी मिळाली. तब्बल तीन वर्षांनंतर भारतीय टी-२० संघात दिनेशचे पुनरागमन झाले. त्याच्या पुनरागमनाने सर्वांनाच आश्चर्य वाटले; पण दिनेश कार्तिकने आपल्या कामगिरीच्या जोरावर स्वत:ला सिध्द करून दाखविले. तरीही क्रिकेटशौकिनांकडून दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतच्या कामगिरीची नेहमीच तुलना केली जाते.