
नवी दिल्ली : २०२८मध्ये लॉस एंजेल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. मात्र या स्पर्धेत पुरुष व महिला गटांत प्रत्येकी सहा संघच असतील. त्यातच अमेरिका यजमान देश असल्याने त्यांना थेट पात्रता मिळू शकते. अशा स्थितीत पाच संघच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात.
१२८ वर्षांनी तब्बल क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतत आहे. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झाले होते. त्यामध्ये फक्त महिला गट होता. तर २०२३च्या आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुषांनी सुवर्णपदक पटकावले. आता ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा समावेश होणार असल्याने भारताला दुहेरी पदकांची उत्तम संधी आहे. मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) जाहीर केलेल्या नियमावलीनुसार फक्त ६ संघच प्रत्येक गटात सहभागी होणार आहे.
प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल. टी-२० प्रकारात ही स्पर्धा होईल. त्यामुळे आता आयसीसी क्रमवारीनुसार हे संघ ठरणार की ठरावीक काळापर्यंतच्या कामगिरीचा आढावा यासाठी घेतला जाईल, हे पहावे लागेल.