टी-२० विश्वचषकासाठी आता आपला संघ कधी जाहीर करायचा, याची कट ऑफ डेट आता आयसीसीने जाहीर केली आहे. आयसीसीने म्हटले आहे की, प्रत्येक संघाने १५ सप्टेंबरपर्यंत आपेल संघ जाहीर करायचे आहेत. दरम्यान, गेल्या पाचही ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताने एकही बदल केलेला नाही त्यामुळे आता जवळपास भारताचा विश्वचषकाचा संघ निवडला गेला आहे, असे म्हटले जात आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये भारताचे सहा कर्णधार बनवण्यात आले आहेत.
भारतीय संघाला विश्वचषकासाठी संघ निवडताना बराच अवधी मिळाला आहे. या कालावधीमध्ये भारतीय संघ चार मालिका खेळणार आहेत. त्यामुळे या मालिकांमध्ये आता कोणते प्रयोग केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
गेल्या आठ महिन्यांमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, रिषभ पंत आणि आता हार्दिक पंड्या असे सहा कर्णधार पाहायला मिळाले आहेत. या सहा कर्णधारांपैकी सध्याच्या घडीला लोकेश राहुल हा जायबंदी आहे, त्यामुळे त्याला इंग्लंडच्या दौऱ्यावर जाता आलेले नाही. भारताकडे सध्याच्या घडीला बरेच पर्याय सलामीसाठी उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी जर एखाद्या खेळाडूने दमदार कामगिरी केली तर लोकेश राहुलचे स्थान धोक्यात येऊ शकते.