Video : धवल कुलकर्णीला थाटात निरोप, 'मॅच विनिंग' विकेट घेताच झाला भावुक

पदार्पणातील म्हणजेच २००८च्या हंगामातील अंतिम फेरीत आणि अखेरच्या (२०२४) हंगामातील रणजीच्या अंतिम सामन्यातही धवलनेच प्रतिस्पर्धी संघाचा शेवटचा बळी मिळवला.
Video : धवल कुलकर्णीला थाटात निरोप, 'मॅच विनिंग' विकेट घेताच झाला भावुक
(छायाचित्र सौजन्य - पीटीआय)

रणजी चषकाच्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भावर १६९ धावांनी मात केली. मुंबईचा ३५ वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीचा हा कारकीर्दीतील अखेरचा सामना होता. धवलनेच मुंबईसाठी १०वा बळी मिळवून विजयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर तो काहीसा भावुकही झाला. संघ सहकाऱ्यांनी धवलला खांद्यावर उचलले. तसेच प्रेक्षकांचे अभिवादन करण्यासही धवल विसरला नाही.

भारताकडून धवलने १२ एकदिवसीय व २ टी-२० सामने खेळले. मात्र मुंबईसाठी तो सातत्याने रणजी स्पर्धेत खेळला. एमसीएनेसुद्धा धवलचा विशेष सत्कार केला. यावेळी धवलचे कुटुंबीयही उपस्थित होते. धवलने २००८मध्ये रणजीत मुंबईकडून पदार्पण केले. त्याने ९५ प्रथम श्रेणी सामन्यांत २८१ बळी मिळवले. धवलचा संघात समावेश असताना मुंबईने पाच वेळा रणजी स्पर्धा जिंकली. मुख्य म्हणजे पदार्पणातील म्हणजेच २००८च्या हंगामातील अंतिम फेरीत आणि अखेरच्या (२०२४) हंगामातील रणजीच्या अंतिम सामन्यातही धवलनेच प्रतिस्पर्धी संघाचा शेवटचा बळी मिळवला.

चाहत्यांसह जल्लोष, नृत्य आणि खास गाणे

धवल कुलकर्णीने उमेश यादवचा त्रिफळा उडवल्यावर मुंबईच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. तसेच सपोर्ट स्टाफनेसुद्धा मैदानात धाव घेतली. जेतेपदाचा चषक स्वीकारल्यानंतर मुंबईच्या सर्व खेळाडूंनी विजय मर्चंट स्टँडमध्ये बसलेल्या चाहत्यांचे अभिवादन केले. यावेळी त्यांनी धवलला खांद्यावर उचलले. तसेच छायाचित्रासाठी पोझही दिली. पाठदुखी विसरून श्रेयस अय्यरने पारंपरिक ढोलच्या तालावर ठेका धरला. तसेच शार्दूलने खास ‘वी आर मुंबई बॉइज’ गाणेही गायले. अखेर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात त्यांनी ‘चॅम्पियन्स’च्या फलकासह छायाचित्र काढले आणि संपूर्ण वानखेडे ढोल-ताशाच्या गजरावर नाचू लागले.

logo
marathi.freepressjournal.in