
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये (ICC World Cup 2022) भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामधील सामन्यात थर्ड अंपायरने दिलेला निर्णय हा पुन्हा एकदा वादाचा विषय ठरला आहे. ग्रुप २ मध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी चुरस निर्माण झाली असताना भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना हा खूप महत्त्वाचा ठरला. पहिली फलंदाजी करताना भारताने १८४ धावांचे आव्हान बांगलादेशसमोर ठेवले.
दरम्यान विराट कोहली चांगली फलंदाजी करत होता. तर, दुसरीकडे दिनेश कार्तिकला धावबाद देण्याच्या निर्णयावरुन अनेकांनी संताप व्यक्त केला. 'थर्ड अंपायर आंधळा आहे का?' असा थर्ड अंपायर डोळ्यांवर पट्टी बांधून निर्णय देतात का? असे प्रश्न अनेकांनी कार्तिकला बाद घोषित करण्यावरुन उपस्थित केले.
१७व्या ओव्हरमध्ये भारतीय संघाने १५० धावांची खेळी केली होती. यावेळी कार्तिक धावबाद झाला. पण कार्तिकला धावबाद करताना चेंडूऐवजी हातानेच गोलंदाजाने स्टॅम्प उडवले. गोलंदाज शोरफूल अहमदने आधी स्टॅम्पना हात लावला आणि यष्ट्यांवरील बेल्स पडल्या. चेंडू आणि स्टॅम्प्समध्ये स्पष्टपणे अंतर असल्याचे अनेकांनी हेरले आणि याचा स्क्रीनशॉट शेअर करत थर्ड अंपायरवर टीका केली.