तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारताचा १७ धावांनी पराभव केला. विजयासाठी २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला निर्धारित २० षटकांत ९ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळालेली नसतानाही शतकवीर सूर्यकुमार यादवने (५५ चेंडूंत ११७) विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याने सहा षटकार आणि १४ चौकार लगावले. त्याचे शतक व्यर्थ ठरले. भारताने मालिका २-१ अशी जिंकली; पण इंग्लंडने शेवट गोड केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड मालन (३९ चेंडूंत ७७) आणि लिआम लिव्हिंगस्टोन (२९ चेंडूंत नाबाद ४२) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर निर्धारित २० षटकांमध्ये ७ बाद २१५ धावा केल्या होत्या. रवी बिश्नोई, हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. आवेश खान, उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. ख्रिस जॉर्डन ११ धावांवर धावबाद झाला. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली. त्यामुळे हा सामना औपचारिकतेपुरताच उरला होता.
एजबस्टन येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात शनिवारी भारताने ४९ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेवर कब्जा केला होता. त्या सामन्यात १५ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले होते.