माजी कबड्डीपटू विजय म्हात्रे यांचे निधन

निगर्वी, निर्व्यसनी, नि:स्वार्थी असा त्यांचा स्वभाव होता. त्यांचे वडील नामांकित हुतूतू खेळाडू.
माजी कबड्डीपटू विजय म्हात्रे यांचे निधन

मुंबई : रायगडचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू विजय म्हात्रे यांचे अखेर प्रदीर्घ आजारानंतर १४ मार्च रोजी सकाळी ७च्या सुमारास निधन झाले. निधना समयी ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

गेली बरीच वर्ष ते आजाराशी लढत होते. निगर्वी, निर्व्यसनी, नि:स्वार्थी असा त्यांचा स्वभाव होता. त्यांचे वडील नामांकित हुतूतू खेळाडू. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत विजय यांनी काळभैरव मंडळ, बोरसे संघातून कबड्डी खेळाला प्रारंभ केला. पण रायगड जिल्ह्यात त्यांना खेळाडू म्हणून नोकरी मिळाली नाही. शेवटी प्राथमिक शाळेत ते शिक्षक म्हणून भरती झाले. ते शिक्षक असल्याने ‘गुरुजी’ या नावाने कबड्डी वर्तुळात ते प्रचलित झाले.

शेवटी आपले नशीब आजमावण्याकरिता ते मुंबईत आले. मुंबईतील अरुणोदय या विजू व मायकेल पेणकर यांच्या संघातून ते खेळले. मध्य रेल्वेत ते नोकरीस राहिले. त्यांचा खेळ पाहून महिंद्रा संघाने त्यांना आपल्या सेवेत रूजू करून घेतले. २००१पर्यंत ते महिंद्रा संघाकडून खेळले. मुंबई जिल्हा संघाकडून ते प्रथम महाराष्ट्र संघात निवडले गेले. नंतर रायगड जिल्हा संघाकडून देखील ते बरेच वर्ष खेळले. महाराष्ट्राकडून ते ५ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत खेळले. महाराष्ट्राचे नेतृत्व देखील त्यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in