

नवी दिल्ली : ईडन गार्डन्सवर तयार केलेल्या गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टीचा उल्लेख करत अशा खेळपट्ट्यांमुळे खेळाडूंमध्ये सुधारणा होत नसून उलट कसोटी क्रिकेट उद्ध्वस्त होत असल्याची टीका भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात १२४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ३० धावांनी पराभूत झाला. हा सामना ३ दिवसांत संपला. अशा खेळपट्ट्यांनी कसोटी क्रिकेट संपवून टाकले आहे, असे हरभजन म्हणाला.
गोलंदाजांना अनुकूल अशा विकेट्स इथे अनेक वर्षांपासून तयार केल्या जात आहेत. मी हे पाहत आलो आहे. मात्र त्याविरोधात कोणी शब्द काढत नाही. कारण अशा खेळपट्ट्यांचा फायदा भारतालाच होतो. अशा खेळपट्ट्यांवर विकेट मिळतात, संघ जिंकतो. काही गोलंदाज अशा खेळपट्ट्यांमुळे महान बनत आहेत. त्यामुळे अशा खेळपट्ट्यांविरोधात कोणीच काही बोलत नाही, असे हरभजन सिंग म्हणाला.
मला वाटते की, ही पद्धत आजची नाही; अनेक वर्षांपासून खेळपट्ट्यांच्या बाबतीत हेच सुरू आहे. मात्र हे चुकीचे आहे, असे २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयात याच मैदानावर १३ विकेट घेणारा हरभजन म्हणाला.
अशा खेळपट्ट्यांमुळे खेळाडूंचा विकास होत नसल्याने आता यावर विचार करण्याची वेळ आली आहे. अशा विकेटमुळे तुम्ही पुढे जात नाहीत. नुसते गोल गोल फिरत आहात. तुम्ही जिंकता आहात, पण अशा विजयाचा काही फायदा नाही. एक क्रिकेटर म्हणून तुमचा विकास होत नाही, असे हरभजनला वाटते.
आता यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. अशा खेळपट्ट्यांमुळे फलंदाजांना धावा जमवणे कठीण होते. त्यामुळे त्या फलंदाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्यामुळे सक्षम फलंदाज आणि सक्षम गोलंदाजांत फरक उरत नाही. खेळपट्टी गोलंदाजांसाठी इतकी अनुकूल होते की फलंदाज खेळपट्टीमुळे बाद होऊ लागतात, असे हरभजन म्हणाला.
कसोटी क्रिकेट ज्या पद्धतीने खेळले जाते आहे, ते पाहून वाईट वाटते. आपण अशा खेळपट्ट्या का तयार करतो हे मला कळत नाही, असे १०३ कसोटी सामन्यांत ४१७ विकेट घेणारा हरभजन म्हणाला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा व अंतिम कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटीत खेळला जाणार आहे.