हर्षल, चहल लयीत परतणार? भारत, ऑस्ट्रेलिय टी-२० मालिकेचा आज फैसला होणार

ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत बरोबरी साधल्याने जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे.
हर्षल, चहल लयीत परतणार? भारत, ऑस्ट्रेलिय टी-२० मालिकेचा आज फैसला होणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका बरोबरीत असल्याने रविवारी हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणारा सामना निर्णायक ठरणार आहे. कोण जिंकणार मालिका, अशी कमालीची उत्सुकता क्रिकेटशौकिनांमध्ये निर्माण झाली आहे. हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल यांनी लयबद्ध गोलंदाजी केल्यास मालिकेवर कब्जा सुकर होईल, आशी आशा भारताला वाटत आहे.

नागपूरमध्ये शुक्रवारी ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत बरोबरी साधल्याने जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रत्येकी आठ षट्कांच्या या सामन्यात टीम इंडियासाठी अनेक बाबी अनुकूल ठरल्या; तर काही बाबी प्रतिकूल झाल्या.

अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुनरागमन केले. त्याने दोन षट्कांत २३ धावा दिल्या; पण आपल्या अप्रतिम यॉर्करने प्रभावित केले. कर्णधार फिंचचा अशाच भन्नाट यॉर्करवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे बुमराहचा लयीत असल्याचे सिद्ध झाले. आता रविवारच्या सामन्यात तो पूर्ण बहरात येईल, अशी अपेक्षा आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय अचूक ठरला. तो आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला. त्याने धडाकेबाज खेळी केली. त्याचा स्ट्राइक रेट २३०.०० इतका होता. प्रदीर्घ काळानंतर त्याने अशी शानदार फलंदाजी केली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी हे चांगले संकेत असले, तरी तू्र्तास त्याला मालिका जिंकण्याच्या दृष्टीनेच रविवारचा सामना हाताळावा लागेल

खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल

भारत आतापर्यंत हैदराबादमध्ये अजिंक्य राहिला आहे. भारताने ६ डिसेंबर २०१९ रोजी विंडिजविरुद्धच्या सामन्यात २०९ धावा केल्या होत्या. यावरून हैदराबादची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट होत आहे. विराट कोहली आणि के एल राहुल या जोडीकडून तिसऱ्या सामन्यात मोठ्या अपेक्षा आहेत. विंडिजविरुद्धच्या २०१९ मधील सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी १०० धावांची भागीदारी केली होती. विराटने त्यावेळी नाबाद ९४ धावांची खेळी केली होती. राहुलनेही ६२ धावांची शानदार खेळी साकारली होती. शिवाय, या जोडीच्या नावावर हैदराबादमध्ये सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम आहे.

डेथ ओव्हरबाबत चिंता वाढली

नागपूरमधील दुसऱ्या टी-२० सामन्यात हर्षल पटेल सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने दोन षट्कांत ३२ धावा बहाल केल्या. त्यामुळे डेथ ओव्हरबाबत टीम इंडियाची चिंता वाढली आहे. आयपीएलमध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध झालेला हर्षल दुखापतीतून परतल्यानंतर लय गमावून बसला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन करताना दोन्ही सामन्यात त्याला यॉर्कर प्रभावीपणे टाकण्यात अपयश आले. त्याला टी-२० विश्वचषक संघात स्थान देण्यात आले असून तो संघाचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. अशा परिस्थितीत हर्षलला लवकरच फॉर्ममध्ये परतावे लागणार आहे. चहलने विंडिजविरुद्ध झालेल्या २०१९ च्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. चहलने तेव्हा चार ओव्हर्समध्ये ३६ धावा देत दोन फलंदाज गारद केले होते. त्यामुळे आताही चहलने अशीच चमकदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. युझवेंद्र चहलकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in