इंग्लंडविरुद्धच्या पुनर्नियोजित पाचव्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करत नवा विक्रम प्रस्थापित केला. पाहुण्या संघांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकाविले. चौथ्या दिवशी ३६ धावा करताच पंतने हा विक्रम आपल्या नावावर केला.
१९५० मध्ये वेस्ट इंडिजच्या क्लाइड वालकॉटच्या नावावर असलेला विक्रम पंतने मोडला. वॉलकॉटने लॉर्ड्स कसोटीत नाबाद १४ आणि १६८ धावांची खेळी केली होती. वॉलकॉटने एकूण १८२ धावा केल्या होत्या. पंतने पहिल्या डावात धडाकेबाज शतक झळकावताना १४६ धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावातही त्याने अर्धशतक झळकविले होते. दुसऱ्या डावात पंतने ५७ धावांची खेळी केली. अशा प्रकारे पंतने कसोटी सामन्यात २०३ धावा केल्या.
२०११ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीत माजी कर्णधार एम एस धोनीच्या १५१ धावसंख्येलाही पंतने मागे टाकले. धोनीने दोन डावात नाबाद ७७ आणि ७४ धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.