“बाबर आझम कर्णधार कसा झाला कळेना,” अशा शब्दात माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानच्या पराभवाला कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाला जबाबदार धरले. शोएबने ‘कॅप्टन्सी’बाबत भारताचा कर्णधार रोहित शर्मालाही सुनावले.
एका वृत्तवाहिनीला शोएबने सांगितले की, हा सामना अटीतटीचा झाला असला, तरी दोन्ही संघांनी अनेक प्रसंगी अगदी वाईट खेळीचे प्रदर्शन केले. केवळ पाकिस्तानच नव्हे, तर भारतानेही खेळात अनेक चुका केल्या; मात्र भारताच्या चुकांचा फायदा उठविता न आल्याने पाकिस्तानचा पराभव झाला.
शोएबने पाकिस्तानच्या फलंदाजांवर आगपाखड केली. तो म्हणाला की, “रिझवानसारख्या खेळाडूने ४५ चेंडूत ४५ धावा केल्या तर काय फरक पडेल. रिझवानने पॉवरप्लेमध्ये १९ डॉट बॉल खेळले. जर पॉवरप्ले असाच जाऊ दिला तर पराभव होणार हे निश्चित असते.”
शोएब म्हणाला की, “मी बाबर आझमला अनेकदा सांगितले आहे की, त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. फखर झमानला रिझवानसोबत भागीदारीसाठी पाठवावे. आसिफ अलीच्या आधी शादाब खानला फलंदाजीसाठी पाठविले. बाबर आझमची ‘कॅपटन्सी’ माझ्या आकलनापलीकडची आहे.”
भारत सामना हरण्यासाठी प्रयत्न करतोय की काय, असे वाटत होते
शोएब अख्तरने भारताच्या प्लेइंग इलेव्हनलाही आक्षेप घेतला. तो म्हणाला की, “भारत सामना हरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोय की काय, असे वाटत होते. ऋषभ पंतला प्लेइंग-११ मध्ये स्थान देण्यात आले नाही. फॉर्ममध्ये असतानाही त्याची निवड न करण्यावरूनच रोहितलाही कर्णधारपद कसे हाताळायला हवे हे फार कळलेले दिसत नव्हते.”
शाहीद आफ्रिदी, वसीम अक्रम यांचेही टीकास्त्र
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव झाल्याने समर्थकांसह पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी देशाच्या संघावर टीकेची झोड उठविली आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू विद्यमान टीमवर निशाणा साधत आहेत. आफ्रिदी, अक्रम यांनीही पाकिस्तान संघावर टीका केली आहे.