
दुबई : आयसीसीने सोमवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मधील सर्वोत्तम १२ खेळाडूंचा संघ जाहीर केला. या संघात भारताच्या तब्बल ६ खेळाडूंना स्थान लाभले आहे. संघाचे नेतृत्व मात्र न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माला या संघात स्थानच मिळालेले नाही.
प्रथेप्रमाणे प्रत्येक जागतिक टी-२० अथवा एकदिवसीय स्पर्धेनंतर आयसीसीकडून स्पर्धेतील सर्वोत्तम १२ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात येतो. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीच्या आधारे निवडण्यात आलेल्या संघात भारताचा तारांकित विराट कोहली, चौथ्या क्रमांकावरील श्रेयस अय्यर, यष्टिरक्षक के. एल. राहुल, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांना मुख्य संघात स्थान लाभले आहे. तसेच डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलचा १२वा खेळाडू म्हणून संघात समावेश आहे. याव्यतिरिक्त न्यूझीलंडचे चार खेळाडू म्हणजेच सँटनर, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स व मॅट हेन्री या संघाचा भाग आहेत. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झादरान व अझमतुल्ला ओमरझाई यांनाही संघात स्थान लाभले. अन्य पाच संघांपैकी मात्र कुणीही आयसीसीच्या संघात स्थान मिळवू शकले नाहीत.
आयसीसीचा स्पर्धेतील सर्वोत्तम संघ
मिचेल सँटनर (कर्णधार), रचिन रवींद्र, इब्राहिम झादरान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ग्लेन फिलिप्स, अझमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद शमी, मॅट हेन्री, वरुण चक्रवर्ती. १२ वा खेळाडू : अक्षर पटेल