अहमदाबाद : भारताचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा यंदाच्या विश्वचषकात अद्याप एकही धाव करू शकलेला नाही. त्यामुळेच रविवारी रंगणाऱ्या सुपर-आठ फेरीतील दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या लढतीत अभिषेककडे सर्वांचे पुन्हा लक्ष असेल. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अभिषेक फिरकीपटूंविरुद्ध विशेष सराव करताना दिसला. तसेच प्रशिक्षक गौतम गंभीरनेही त्याच्याशी दीर्घकाळ संवाद साधला, तर पत्रकार परिषदेत गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने अभिषेकच्या कामगिरीची मुळीच चिंता नाही, असे स्पष्ट करत त्यास पाठिंबा दर्शवला.
टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू असली, तरी २५ वर्षीय अभिषेकच्या कामगिरीची संघाला चिंता आहे. आजारी असल्याने अभिषेक नामिबियाविरुद्ध खेळू शला नव्हता. तर अमेरिका, पाकिस्तान व नेदरलँड्स या संघांविरुद्ध तो अनुक्रमे १, ४ व ३ चेंडू खेळून भोपळाही न फोडता माघारी परतला. म्हणजेच ३ सामन्यांत त्याची धावसंख्या शून्य आहे. विशेषत: पाकिस्तान व नेदरलँड्सने पहिल्याच षटकात अभिषेकसमोर ऑफस्पिनरला आणून त्याला जखडून ठेवले. तसेच यष्ट्यांच्या दिशेने गोलंदाजी केली. त्यामुळेच अभिषेक मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद किंवा त्रिफळाचित झाला. आता सुपर-आठ फेरीतही आफ्रिका, झिम्बाब्वे व विंडीजचे संघ त्याच्या या कमकुवत बाजूचा लाभ उचलू शकतात.
“अभिषेकच्या संघातील स्थानाविषयी आम्ही कोणतीही चर्चा केलेली नाही. तो एक उत्तम फलंदाज आहे. सुपर-आठ फेरीत नक्कीच अभिषेक भारतासाठी फलंदाजीत मोलाचे योगदान देईल. प्रशिक्षक गंभीरने अभिषेकशी वैयक्तिक चर्चा केली असून तो सरावात फिरकीपटूंविरुद्ध विशेष मेहनत घेत आहे. अभिषेकची फलंदाजी पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत. लवकरच तो फॉर्मात परतेल,” असे मॉर्केल म्हणाला.
काही माजी क्रिकेटपटूंनी अभिषेकला पहिल्या षटकात चौकार-षटकाराद्वारे खाते न उघडण्याची तसेच घाई न करण्याचे सुचवले आहे.
(ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामन्यापर्यंत)