

पाल्लेकेले : टी-२० विश्वचषकात शुक्रवारी न्यूझीलंडला धक्का बसल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा अद्याप कायम आहेत. शनिवारी त्यांनी सुपर-आठ फेरीत श्रीलंकेला ६४ धावांच्या फरकाने नमवले किंवा श्रीलंकेने दिलेले लक्ष्य १३.१ षटकांत गाठले, तर पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. त्यामुळेच या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. त्यांपैकी अ-गटातून भारत, पाकिस्तान, ब-गटातून झिम्बाब्वे, श्रीलंका, क-गटातून वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ड-गटातून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांनी आगेकूच केली. आता सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले आहेत. यांपैकी पहिल्या गटात भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका हे संघ सहभागी आहेत.
श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र ते पाकिस्तानलाही बाहेर घेऊन जाऊ शकतात. तर पाकिस्तानचा संघ २०२२नंतर पुन्हा उपांत्य फेरी गाठण्यास आतुर असेल. त्यामुळे एकूणच या लढतीकडे क्रीडाविश्वाचे लक्ष लागून आहे.
प्रतिस्पर्धी संघ
श्रीलंका : दसुन शनका (कर्णधार), कुशल मेंडिस, पथुम निसांका, दुश्मंता चमिरा, दुनिथ वेल्लालागे, कामिंदू मेंडिस, कामिल मिशारा, पवन रत्नायके, कुशल परेरा, महीष थिक्षणा, चरिथ असलंका, मथीशा पाथिराना, जनिथ लियांगे, इशान मलिंगा, दुशन हेमंता.
पाकिस्तान : सलमान अघा (कर्णधार), बाबर आझम, फखर झमान, ख्वाजा नफाय, साहिबझादा फरहान, उस्मान खान, फहीम अश्रफ, मोहम्मद नवाझ, सय्यम अयूब, शादाब खान, अब्रार अहमद, नसीम शाह, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक.