

अहमदाबाद : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी दुपारी होणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज एकेमकांविरुद्ध उभे ठाकतील. सुपर-आठ फेरीच्या पहिल्या गटातील या लढतीकडे तमाम भारतीयांचेही लक्ष असेल. विजेता संघ उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच करेल, तर पराभूत संघाला शेवटच्या सामन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. भारताच्या दृष्टीने आफ्रिका जिंकणे निर्णायक ठरेल.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. त्यांपैकी अ-गटातून भारत, पाकिस्तान, ब-गटातून झिम्बाब्वे, श्रीलंका, क-गटातून वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ड-गटातून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांनी आगेकूच केली. आता सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले आहेत. यांपैकी पहिल्या गटात भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.
एडीन मार्करमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथेच सुपर-आठ फेरीच्या पहिल्या लढतीत भारताला धूळ चारली. डेव्हिड मिलर, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, क्विंटन डीकॉक असे एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज त्यांच्या ताफ्यात असून मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर खेळण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. गोलंदाजीत कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, मार्को यान्सेन असा तोफखाना त्यांच्याजवळ आहे.
दुसरीकडे शाय होपच्या नेतृत्वात खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने गटातील अग्रस्थानासह आगेकूच केली होती. तसेच वानखेडेवर सुपर-आठ फेरीतील पहिल्या लढतीत त्यांनी झिम्बाब्वेचा १०७ धावांनी फडशा पाडला. शिम्रॉन हेटमायर, शर्फेन रुदरफोर्ड, रोवमन पॉवेल असे तुफानी आतषबाजी करणारे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. गोलंदाजीत गुडाकेश मोटी व अकील होसेन यांची फिरकी जोडी घातक ठरत आहे. दुपारी ही लढत होणार असल्याने दव येणार नाही व पावसाचीसुद्धा शक्यता नाही. अशा स्थितीत दर्जेदार लढत पाहायला मिळू शकते.