मुंबई : टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा धुमधडाका पाहायला मिळाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या या लढतीत वेस्टइंडीजने २० षटकात ६ बाद २५४ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ १७.४ षटकांत १४७ धावांत गारद झाला. त्यामुळे विंडीजने सुपर आठ फेरीत तब्बल १०७ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. विंडीजच्या या धडाकेबाज विजयामुळे भारताची धाकधूक नक्कीच वाढली आहे.
तब्बल २० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना विंडीजने कर्णधार होप आणि ब्रांडन किंग यांना स्वस्तात गमावले. मात्र त्यानंतर शिम्राॅन हेटमायर आणि रोवमन पाॅवेल यांनी चौकार षटकारांची उधळण केली. हेटमायरने ७ षटकारांसह ३४ चेंडूंत ८५ धावा फटकाविल्या. तर पॉवेलने ३५ चेंडूंत ५९ धावा ठोकल्या. त्यामुळे विंडीजने अडीचशे धावांपुढे मजल मारली. यंदाच्या विश्वचषकातील तसेच वानखेडे स्टेडियमवरील ही सर्वोच्च टी-२० धावसंख्या ठरली. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्स्ने ४३ धावांची एकाकी झुंज दिली. तोच १८व्या षटकात बाद झाला आणि विंडीजने विजय मिळवला. दरम्यान, भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले होते. त्यानंतर आता सुपर आठ फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील.