डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमारने (५/१०३) केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारत-अ संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड-अ संघाला ११३ धावांनी नेस्तनाबूत केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका १-० अशा फरकाने जिंकली. उभय संघांतील पहिल्या दोन लढती अनिर्णीत राहिल्या होत्या.
भारताने दिलेल्या ४१६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड-अ संघाचा दुसरा डाव ८५.२ षट्कांत ३०२ धावांत संपुष्टात आला. जो कार्टरने १११ धावांची झुंजार शतकी खेळी साकारली. डॅन क्लीव्हर (४४) आणि मार्क चॅपमन (४५) यांनीही कडवा प्रतिकार केला; मात्र सौरभने पाच बळी मिळवून न्यूझीलंडला रोखले. सर्फराज खानने दोन, तर शार्दूल ठाकूर, मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद करून सौरभला उत्तम साथ दिली. उभय संघांतील एकदिवसीय मालिकेला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे.