IND vs BAN, CWC 2023: भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला २५६ धावांवर रोखलं ; आता मदार फलंदाजांवर

भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशने निर्धारित ५० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात २५६ धावांपर्यंत मजल मारली.
IND vs BAN, CWC 2023: भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला २५६ धावांवर रोखलं ; आता मदार फलंदाजांवर

आज पुण्यात रंगलेल्या भारत आणि बांगलादेश संघातील सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीत चांगली सुरुवात केल्यानंतर बांगलादेशची फलंदाजी ढासळली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशने निर्धारित ५० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात २५६ धावांपर्यंत मजल मारली. सलमी फलंदाज लिटन दासने ६६ तर टी हसनने ५१ धावांची खेली केली. त्याशिवाय अखेरिस महमुदल्लाहने ४६ धावांचं महत्वाचं योगदान दिलं. भारताकडून रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आता यंदाच्या विश्वचषकात सलग चौथ्या विजयासाठी भारताला २५७ धावांचं आव्हान आव्हान आहे.

बांगलादेशचा कर्णधार मजमुल हसन शांतो याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी हसन आणि लिटन दास यांनी बांगलादेशसाठी आक्रमक सुरुवाद केली. या दोघांनी १४ षटकात ९३ धावांची भागिदारी केली. हसन याने ४३ चेंडूत ५१ धावांचं योगदान दिले. या खेळीत त्याने तीन षटकार आणि पाच चौकार चोपले. तर लिटन दासने ८२ चेंडूत सात चौकारांच्या मदतीने ६६ धावांची दमदार खेळी केली. या दोन्ही फलंदाजांचा अपवाद वगळता एकाही बांगलादेशी खेळाडूला अर्धशतकी खेळी करता आली नाही.

भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. सर रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. जाडेजाने टाकलेल्या दहा षटकांत फक्त ३८ धावा दिल्या. दरम्यान त्याने लिटन दास आणि शांतो यांना तंबूत पाठवलं.

कुलदीप यादवने भारताला पहिलं यश मिळवून दिलं होतं. त्याने आपल्या दहा षटकात ४७ धावा देत एक बांगलादेशचा एक गडी बाद केला. तर मोहम्मद सिराजनने १० षटकांत ६० धावा देत दोन गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने १० षटकात ४१ धावा दिल्या, त्या बदल्यात त्याने बांगलादेशचे दोन खेळाडू तंबूत पाठवले. तर शार्दुल ठाकूरने ९ षटकात ५९ धावा देत एक विकेट घेतली.

दरम्यान, आजच्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन दुखापतीमुळे आज संघाबाहेर आहे. त्यामुळे आज बांगलादेशच्या कर्णधार पदाची जबाबदारी नजमुल हसन शांतो यांच्यावर आहे. तर भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्याला गोलंदाजी करताना पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यामुळे भारतीय संघाला देखील मोठा धक्का बसला आहे. यामुळे बांगलादेशच्या संघाने दिलेलं २५७ धावांचं आव्हान भारतीय संघ कशा प्रकारे पेलतो, हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in