
भारत विरुद्ध बांगलादेशच्या पहिल्या कसोटीमधील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आणि भारताचा विजय आणखी एक दिवस लांबणीवर गेला. कारण, ५१३ धावांचे डोंगराएवढे आव्हान असतानाही बांगलादेशने कडवी झुंज देत ६ बाद २७२ धावा केल्या. पण, भारतीय संघ आता विजयापासून फक्त ४ पावले दूर आहे. कारण, बांगलादेशला अखेरच्या दिवसात २४१ धावा कराव्या लागणार आहेत. भारताने पहिल्या डावात ४०४ धावा केल्या. नंतर बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळला. तर दुसऱ्या डावामध्ये भारताने २ बाद २५८ धावांवर डाव घोषित केला आणि ५१३ धावांचे लक्ष बांग्लादेशसमोर ठेवले.
बांगलादेशने दुसऱ्या डावाची सुरुवात दमदार केली. जाकिर हसनने पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले. सलामीवीर नजमुल हुसैन शांतो आणि जाकिर हसनने पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. मात्र, ही जोडी फुटल्यानंतर बांगलादेशचा डाव गडगडला. अक्षर पटेल, कुलदीप यादवने बांगलादेशच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. उमेश यादवने नजमुल हुसैन शांतो पहिली विकेट घेत मोठा ब्रेक मिळवून दिला. त्यानंतर अश्विन, कुलदीप यादवने १ तर अक्षर पटेलने ३ विकेट घेतल्या.