कराची : पाकिस्तान संघाने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याची घोषणा रविवारी केली. मात्र ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
भारतातील सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी फेटाळून लावल्यामुळे बांगलादेशने या स्पर्धेत न खेळण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बांगलादेशची हकालपट्टी करत स्कॉटलंडला स्थान दिले आहे. या घडामोडी लक्षात घेता, पाकिस्ताननेही भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याची भूमिका जाहीर केली. पाकिस्तान सरकारनेच अधिकृत निवेदनाद्वारे ही घोषणा केली.
“बांगलादेशच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आमची भूमिका असल्यामुळेच आम्ही या स्पर्धेत सहभागी होण्याबाबतचा आढावा घेतला,” असे पाकिस्तान सरकारने म्हटले आहे.