
नॉर्थहॅम्पटन : भारत-अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील दुसरा चार दिवसीय सामनाही अनिर्णित राहिला. दुसऱ्या डावात भारत-अ संघाकडून के. एल. राहुल (६४ चेंडूंत ५१ धावा), तनुष कोटियन (१०८ चेंडूंत नाबाद ९०), कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (९२ चेंडूंत ८०) आणि अंशुल कंबोज (८६ चेंडूंत नाबाद ५१) यांनी अर्धशतके झळकावली.
भारत-इंग्लंड यांच्यात २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी सराव म्हणून भारताच्या मुख्य संघांतील अनेक खेळाडू भारत-अ संघाकडून या मालिकेत खेळले. आता भारतीय संघाचा भारत-अ संघाशी सराव सामनाही होणार आहे. शुभमन गिल यंदा भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणार असून रोहित शर्मा व विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर प्रथमच भारतीय संघ एखादी मालिका खेळणार आहे.
दरम्यान, भारताच्या पहिल्या डावातील ३४८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंड लायन्सने ३२७ धावा केल्या. मग दुसऱ्या डावात भारत-अ संघाने ७ बाद ४१७ धावांवर डाव घोषित केला. राहुल, अभिमन्यू, तनुष, अंशुल यांनी अर्धशतके झळकावली. तसेच नितीश रेड्डी (४२), शार्दूल ठाकूर (३४) यांनीही योगदान दिले. मग दुसऱ्या डावात इंग्लंड लायन्सने ३ बाद ३२ धावा केल्यावर वेळ संपल्याने सामना अनिर्णित राहिला.