भारतीय महिलांची विजयी आघाडी!

डावखुरी फिरकीपटू राधा यादवने (२२ धावांत २ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीला शफाली वर्माच्याच्या (३८ चेंडूंत ५१ धावा) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली.
भारतीय महिलांची विजयी आघाडी!

सिल्हेट : डावखुरी फिरकीपटू राधा यादवने (२२ धावांत २ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीला शफाली वर्माच्याच्या (३८ चेंडूंत ५१ धावा) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा ७ गडी आणि ९ चेंडू राखून धुव्वा उडवला. या विजयासह भारताने पाच लढतींच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली असून उभय संघांतील चौथा सामना सोमवारी खेळवण्यात येईल.

सिल्हेट येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत जेमतेम ८ बाद ११७ धावांपर्यंत मजल मारली. दिलाला अख्तर (३९) व कर्णधार निगर सुल्ताना (२८) यांनी चांगली सुरुवात केल्यानंतरही बांगलादेशचा डाव १ बाद ४६वरून ६ बाद १०८ असा गडगडला. श्रेयांका पाटील, पूजा वस्त्रकार व रेणुका सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेत राधाला उत्तम साथ दिली.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १८.३ षटकांतच विजय मिळवला. शफाली व महाराष्ट्राची स्मृती मानधना (४७) यांनी ७३ चेंडूंत ९१ धावांची सलामी नोंदवली. शफालीने ८ चौकार लगावून कारकीर्दीतील नववे अर्धशतक साकारले. तर स्मृतीने ५ चौकार व १ षटकार लगावला. या दोघी बाद झाल्यावर दयालन हेमलता (९) लवकर माघारी परतली. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद ६) व रिचा घोष (नाबाद ८) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शफाली सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

logo
marathi.freepressjournal.in