भारताची बांगलादेशवर मात; सॉमी, मुशीरची चमकदार कामगिरी, युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

भारताने बांगलादेशवर सलामीच्या सामन्यात ८४ धावांनी विजय मिळवला. भारताचे २५२ धावांचे आव्हान गाठताना बांगलादेशचा डाव ४५.५ षटकांत अवघ्या १६७ धावांवर आटोपला.
भारताची बांगलादेशवर मात; सॉमी, मुशीरची चमकदार कामगिरी, युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

ब्लोएमफोंटेन : सॉमी कुमार पांडे आणि मुशीर खान या डावखुऱ्या फिरकीपटूंच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली. भारताने बांगलादेशवर सलामीच्या सामन्यात ८४ धावांनी विजय मिळवला. भारताचे २५२ धावांचे आव्हान गाठताना बांगलादेशचा डाव ४५.५ षटकांत अवघ्या १६७ धावांवर आटोपला.

कर्णधार उदय सहारन (९४ चेंडूत ६४ धावा) आणि डावखुरा सलामीवीर आदर्श सिंग (७६ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या. भारतासाठी सचिन धस (नाबाद २६), प्रियांशू मोलिया (२३) आणि अविनाश अरावेली (२३) यांनीही योगदान दिले. त्यानंतर सॉमी कुमार पांडे आणि मुशीर खान यांनी बांगलादेशच्या फलंदाजांना पळो की सळो करून सोडले.

भारताचे २५२ धावांचे उद्दिष्ट गाठताना, अशीकर रहमान शिबली आणि जिशान आलम यांनी चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर पांडेच्या फिरकीमुळे बांगलादेशची अवस्था ४ बाद ५० अशी झाली. अरीफुल इस्लाम आणि मोहम्मद शिबाब जेम्स यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचत बांगलादेशला विजयाच्या आशा दाखवल्या. मात्र मुशीर खानने या दोघांचाही अडसर दूर करत भारताच्या विजयाच्या मार्गातील अडसर दूर केला. पांडेने शेवटचे दोन्ही गडी गारद करत बांगलादेशचा डाव १६७ धावांवर संपुष्टात आणला. बांगलादेशकडून मोहम्मद जेम्सने ५४ तर अरीफुलने ४१ धावा फटकावल्या. भारताकडून सॉमी कुमारने चार तर मुशीरने दोन बळी मिळवले.

सॉमी पांडे

९.५-१-२४-४

logo
marathi.freepressjournal.in