
आशिया चषक महिला क्रिकेट २०२२ स्पर्धेमध्ये सोमवारी भारताने मलेशियाचा ३० धावांनी पराभव केला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईसचा नियम भारताच्या पथ्यावर पडला. शानदार अर्धशतक झळकविणारी भारताची सलामीवीर एस. मेघना हिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विजयासाठी १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाक करणाऱ्या मलेशियाने ५.२ षटकात २ गडी गमावत १६ धावा केलेल्या असताना अचानक पाऊस सुरू झाला. सामना पुन्हा सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे भारताला डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ३० धावांनी विजयी घोषित करण्यात आले. मलेशियाने नाणेफेक जिंकंत भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. भारताने २० षटकात ४ गडी गमावत १८१ धावा केल्या. स्मृती मानधना हिला विश्रांती देण्यात आल्याने तिच्या अनुपस्थितीत सलामीला सभिनेनी मेघना ही शेफाली वर्मा हिच्यासोबत सलामीला आली. सभिनेनी मेघना (५३ चेंडूंत ६९ धावा) आणि शफाली वर्मा (३९ चेंडूंत ४६ धावा) यांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये ४७ धावा करत आव्हानात्मक धावसंख्येचा पाया रचला. मेघना-शफाली यांनी ११६ धावांची सलामी दिली. मेघनाने ५३ धावांची अर्धशतकी खेळी करताना ११ चौकार आणि एक षटकार लगावला. मेघना बाद झाल्यानंतर शफालीने रिचा घोष हिच्यासोबत ४२ धावांची भागीदारी केली. शफालीने ३९ चेंडूंत ४६ धावा करताना एक चौकार आणि तीन षटकार लगावले. किरण नवगिरे हिला भोपळा फोडण्यात अपयश आले. विन्फ्रेंड दुराईसंगम आणि नूर दानिया स्यूहादा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळविल्या.