

अहमदाबाद : शिवम दुबेने (३१ चेंडूंत ६६ धावा) साकारलेल्या अर्धशतकाला गोलंदाजांच्या कामगिरीची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने बुधवारी टी-२० विश्वचषकात सलग चौथ्या विजयाची नोंद करताना नामिबियाला १७ धावांनी पराभूत केले.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अ-गटातील साखळी लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १९३ धावांपर्यंत मजल मारली. दुबेने ४ चौकार व ६ षटकारांसह अर्धशतक साकारले. त्याला हार्दिक पंड्याने (३०) उत्तम साथ दिली. मग लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २० षटकांत ७ बाद १७६ धावांपर्यंतच पोहचू शकला. बॅस डी लीडेने ३३ धावा केल्या. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने ३, तर दुबेने २ बळी मिळवून गोलंदाजीतही छाप पाडली. भारताने सुपर-आठ फेरीतील स्थान आधीच पक्के केले होते. आता २१ फेब्रुवारीपासून सुपर-आठ फेरी सुरू होईल.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
या स्पर्धेत अ-गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल.
अ-गटातून भारताने सलग तीन विजयांसह सर्वप्रथम आगेकूच केली. भारताने वानखेडेवर अमेरिकेला पराभूत केले. मग नवी दिल्ली येथे नामिबियाला धूळ चारली. रविवारी कोलंबो येथे पाकिस्तानला चीतपट करून भारताने सुपर-आठ फेरीच्या पहिल्या गटातील स्थान पक्के केले. सुपर-आठ फेरीत दुपारी ३ किंवा सायंकाळी ७ वाजल्यापासून लढतींना प्रारंभ होईल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ३ पैकी किमान २ सामने जिंकणे गरजेचे असेल.
मार्करमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने यूएईला अखेरच्या लढतीत धूळ चारून ड-गटात अग्रस्थान मिळवले. तसेच साहिबझादा फरहानने ५८ चेंडूंत नाबाद १०० धावांची तुफानी खेळी साकारल्यामुळे पाकिस्तानने अ-गटातील शेवटच्या साखळी सामन्यात नामिबियाचा १०२ धावांनी फडशा पाडला. त्यामुळे पाकिस्तानने आगेकूच केली.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ६ बाद १९३ (शिवम दुबे ६६, सूर्यकुमार यादव ३४; लोगान वॅन बीक ३/५६) विजयी वि.
नेदरलँड्स : २० षटकांत ७ बाद १७६ (बॅस डी लीडे ३३; वरुण चक्रवर्ती ३/१४, शिवम दुबे २/३५)
सामनावीर : शिवम दुबे