भारताची हाराकिरी: सर्वबाद ११९ धावा

एकीकडे मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्याने तमाम नागरिक सुखावले असले तरी दुसरीकडे न्यूयॉर्कमध्ये वरुणराजाच्या आगमनाने क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारताची पडझड झाली असली तरी ऋषभ पंतने एका बाजूने किल्ला लढवला.
भारताची हाराकिरी: सर्वबाद ११९ धावा

न्यूयॉर्क : एकीकडे मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्याने तमाम नागरिक सुखावले असले तरी दुसरीकडे न्यूयॉर्कमध्ये वरुणराजाच्या आगमनाने क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारताची पडझड झाली असली तरी ऋषभ पंतने एका बाजूने किल्ला लढवला. तरीही भारताचा डाव १९ षटकांत ११९ धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हॅरिस रौफने प्रत्येकी तीन बळी मिळवले.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय अपेक्षित असल्यामुळे खेळपट्टी ओली होऊन त्याचा फायदा वेगवान गोलंदाजांना मिळणार, हे पाकिस्तानला चांगलेच ठाऊक होते. दुसऱ्याच षटकांत नसीम शाह याने विराट कोहलीला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. आयर्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातही फ्लॉप ठरलेल्या कोहलीला पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात फक्त ४ धावाच करता आल्या. कर्णधार रोहित शर्माकडून चांगली फलंदाजी अपेक्षित असताना त्यानेही निराशा केली. त्यामुळे भारताची अवस्था २ बाद १९ अशी झाली होती.

चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेलने ऋषभ पंत याच्यासह भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी रचली, मात्र नसीम शाहने अक्षरला (२०) त्रिफळाचीत करत भारताला आणखीन अडचणीत आणले. भरवशाचा सूर्यकुमार यादवही फार काही न करताच माघारी परतला. ऋषभने ४२ धावांची खेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in