आशिया चषक हॉकी स्पर्धेत सोमवारी गतविजेत्या भारताशी पाकिस्तानने अखेरच्या क्षणी सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना बरोबरी साधली. त्यामुळे भारताचा हातातोंडाशी आलेला विजय हिरावला गेला.
या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने पाकिस्तानवर १-० अशी आघाडी घेतली. भारताने नवव्या मिनिटाला ही आघाडी मिळविली. पेनल्टी कॉर्नरवर सेल्वम कार्थीने एक शॉट लगावला. हा फटका पाकिस्तानी डिफेंडरच्या हॉकी स्टिकला लागून गोलपोस्टमध्ये गेला आणि भारताला आघाडी मिळाली.
भारताने ही एक गोलची आघाडी हाफटाईम आणि त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्येदेखील कायम ठेवली. भारताने चौथ्या क्वार्टरमध्येदेखील आघाडी कायम ठेवल्याने भारत हा सामना जिंकणार असे वाटत असतानाच पाकिस्तानने अखेरच्या क्षणी गोल करून बरोबरी साधली.
सामना जबरदस्त रंगला. भारताने सुरुवातीपासूनच शानदार खेळ केला. अखेरची पाच मिनिटे शिल्लक असतानाही भारताकडे दमदार आघाडी होती. भारताने ही आघाडी अखेरचे दोन मिनिटे असेपर्यंत कायम ठेवली होती; पण सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना पाकिस्तानच्या अब्दूल राणाने गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली आणि भारताने विजयाची संधी गमावली.
भारताला पहिल्याच सत्रात आघाडी मिळाल्यानंतर पाकिस्तानने जोरदार आक्रमण केले. भारताच्या संघाने यावेळी दमदार बचाव करत पाकिस्तानचे आघाडी घेण्याचे प्रयत्न हाणून पाडले होते.