

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीची बुधवारी बैठक होणार आहे. दुखापतीतून सावरलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यांना एकदिवसीय संघात स्थान मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणाऱ्या संघाचीच निवड केली जाण्याची शक्यता आहे, मात्र ५० षटकांच्या एकदिवसीय संघाच्या निवडीसाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील समितीला बरीच कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, या बैठकीदरम्यान आगरकर यांच्या २०२७ च्या विश्वचषकापर्यंतच्या कराराच्या विस्ताराबाबत बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे.
दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला हार्दिक २० सप्टेंबर रोजी भारत-अ संघातून ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध खेळणार आहे. मात्र, २७ सप्टेंबरपासून तिरुवनंतपुरम येथून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो लगेचच १० षटके गोलंदाजी आणि ५० षटके क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज आहे का, याचा निर्णय निवड समितीला घ्यावा लागेल. नितीश कुमार रेड्डी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये असेल.
यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून के. एल. राहुल पहिली पसंती असण्याची शक्यता असून, श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत तो एकदिवसीय संघाचा उपकर्णधार असू शकतो. इशान किशन आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळत असल्याने पंतला १५ जणांच्या संघात संधी मिळू शकते. पंतची निवड न झाल्यास ध्रुव जुरेलचा पर्याय निवडला जाऊ शकतो.