
पालेकेले : सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या थरारक तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने सरशी साधली. याबरोबरच भारताने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. वॉशिंग्टन सुंदर सामनावीर, तर कर्णधार सूर्यकुमार यादव मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने ९ षटकांत १३७ अशी धावसंख्या उभारली. भारताने यशस्वी जैस्वाल (१०), संजू सॅमसन (०), रिंकू सिंग (१) यांना स्वस्तात गमावले. संजू सलग दुसऱ्या लढतीत शून्यावर बाद झाला. थिक्षणाने यशस्वी, रिंकू यांना जाळ्यात अडकवले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमारही (८) यावेळी अपयशी ठरला. त्यामुळे भारतीय संघ एकवेळ ४ बाद ३० असा संकटात होता. शुभमन गिलने ३७ चेंडूंत ३९ धावांची झुंज दिली. हसरंगाने त्याचा अडसर दूर केल्यावर रियान पराग (२६) व सुंदर (२५) यांनी प्रतिकार केला. मात्र हे दोघेही अनुक्रमे हसरंगा व थिक्षणाच्या जाळ्यात फसले. त्यामुळे भारताला दीडशे धावांचा पल्ला गाठता आला नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेलासुद्धा भारताने २० षटकांत ८ बाद १३७ धावांत रोखले. मुख्य म्हणजे त्यांचा संघ एकवेळ ३ बाद ११७ अशा सुस्थितीत होता. १२ चेंडूंत ९ धावांची आवश्यकता असताना रिंकू सिंग व सूर्यकुमार यांनी अप्रतिम फिरकी गोलंदाजी करून सामना सुपर ओव्हरपर्यंत नेला. तेथे मग सुंदरने चार चेंडूंतच २ धावांच्या मोबदल्यात २ बळी मिळवले. मग सूर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावून भारताचा विजय साकारला. आता उभय संघांतील एकदिवसीय मालिकेला २ ऑगस्टपासून प्रारंभ होईल.