
भारतीय महिला संघ बुधवारी इंग्लंडच्या भूमीवर १९९९नंतर प्रथमच मालिका विजय मिळवण्याच्या ध्येयाने मैदानावर उतरेल. भारत-इंग्लंड यांच्यात बुधवारी दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडवर सात गडी राखून वर्चस्व गाजवले. स्मृती, हरमनप्रीत आणि यास्तिका भाटिया या तिघींनी दमदार अर्धशतके झळकावली. तर गोलंदाजीत दीप्ती शर्माने चमक दाखवली. दुसऱ्या सामन्यात भारताला शफाली वर्माकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा असेल. १९९९मध्ये अंजुम चोप्राच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये अखेरची एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. दुसरीकडे इंग्लंडला कर्णधार अॅमी जोन्स, सोफिया डंक्ले, एलिस कॅप्से यांच्याकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. डॅनी व्हॅट आणि सोफी एकेलस्टोन त्यांच्यासाठी मोलाची भूमिका बजावू शकतात.