मुंबई : २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (कॉमनवेल्थ गेम्स) यजमानपदाचे हक्क अखेर भारताला मिळाले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा कार्यकाळी मंडळातर्फे बुधवारी भारताचे नाव पुढे पाठवण्यात आले असून २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत यावर फक्त शिक्कामोर्तब करण्याची औपचारिकता पूर्ण केली जाईल. अहमदाबाद येथे ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. २०२६चे ऑलिम्पिक आयोजन करण्याच्या दृष्टीने हे पाऊल फार मोलाचे ठरणार आहे.
केंद्र सरकार तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालय २०३६मध्ये भारतात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) ऑगस्ट महिन्यात राष्ट्रकुलमध्ये समावेश असलेल्या सर्व खेळांची तयारी करण्यास भारत समर्थ असल्याचे आश्वासनही दिले होते. २०३०च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भूषवून भारताची तयारी दर्शवण्यासाठी केंद्र सरकार व आयओए प्रयत्नशील आहे. यासंबंधीच आयओएच्या पदाधिकाऱ्यांची ऑगस्टमध्ये विशेष सर्वसाधारण सभा पार पडली.
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह हे प्रमुख ठिकाण ठरणार असून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम व्यतिरिक्त या प्रकल्पात जलक्रीडा केंद्र, फुटबॉल स्टेडियम आणि दोन इनडोअर एरिना यांचा समावेश आहे. त्यामुळे आता नोव्हेंबरमध्ये ग्लासगो येथे राष्ट्रकुल पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यामध्ये लवकरच भारताच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे समजते.
२०२६ची राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो (स्कॉटलंड) येथे होणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत भारताला २०३०च्या राष्ट्रकुलसाठी अधिकृत अर्ज भरावा लागणार होता. भारताने सर्व प्रणाली योग्यपणे पार पाडली. कॅनडाने या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. तर नायजेरियाला डावलण्यात आले आहे. त्यामुळे २०१० नंतर पुन्हा एकदा भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रंगणार आहे.
“सर्वांनी एकमताने राष्ट्रकुलचे यजमानपद मिळवण्यासाठी दावेदारी करण्याचे ठरवले आहे. आम्ही या दृष्टीने तयारीला प्रारंभ केला आहे. अहमदाबाद या स्पर्धेच्या यजमानपदासाठी अग्रेसर आहे,” असे आयओएच्या अध्यक्षा पीटी उषा म्हणाल्या. “२०१०मध्ये आपण राष्ट्रकुलचे यशस्वीपणे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे २०३०मध्येही सर्व खेळांचा समावेश करून आपण ही स्पर्धा आयोजित करू. २०२६मधील ग्लासगो येथील राष्ट्रकुलमध्ये काही खेळांना वगळण्यात येणार आहे. मात्र आपल्या येथील राष्ट्रकुलमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) मान्य सर्व खेळांचा समावेश असेल,” असेही उषा यांनी सांगितले.
२०१०मध्ये राष्ट्रकुलच्या आयोजनासाठी भारताने ७० हजार कोटी खर्च केले होते. त्यावेळी ७२ देशांतील खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. मुख्य म्हणजे १९३०मध्ये राष्ट्रकुल पहिल्यांदा आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर शतकोत्तर वर्षात म्हणजेच २०३०मध्ये भारताला राष्ट्रकुलच्या आयोजनाचा मान मिळणे, हे आणखी अभिमानास्पद ठरणार आहे. एकूणच या स्पर्धेची आता उत्सुकता असून भारत स्पर्धेच्या आयोजनासाठी कितपत खर्च करणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असेल.