भारताचा आज आयर्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना; श्रेयसच्या नेतृत्वपर्वाचा प्रारंभ; वैभवचे पदार्पण?

भारतीय टी-२० क्रिकेटमध्ये शुक्रवारपासून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वपर्वाला प्रारंभ होईल.
भारताचा आज आयर्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना; श्रेयसच्या नेतृत्वपर्वाचा प्रारंभ; वैभवचे पदार्पण?
भारताचा आज आयर्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना; श्रेयसच्या नेतृत्वपर्वाचा प्रारंभ; वैभवचे पदार्पण?(Photo-X)
Published on

बेलफास्ट : भारतीय टी-२० क्रिकेटमध्ये शुक्रवारपासून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वपर्वाला प्रारंभ होईल. विश्वचषक विजयानंतर भारतीय संघ आता नव्या जोमाने पुन्हा टी-२० प्रकारात छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. भारत-आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना शुक्रवारी बेलफास्ट येथे होणार असून या लढतीत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी लाभणार का, याकडेही तमाम भारतीयांचे लक्ष लागून असेल.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने मार्चमध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र आता सूर्यकुमारला भारतीय संघातून वगळत भारताने २०२८चा विश्वचषक व ऑलिम्पिकच्या दृष्टीने संघबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी भारताच्या टी-२० संघातही नसलेला श्रेयस आता कर्णधारपद भूषवण्यासाठी सज्ज असून श्रेयस व प्रशिक्षक गौतम गंभीर यांची जोडी किती यश मिळवणार, हे पाहणे रंजक ठरेल. २०२४मध्ये याच कर्णधार-प्रशिक्षकाच्या जोडीने कोलकाताला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते.

दरम्यान, आयपीएलमधील चमकदार कामगिरी आणि त्यानंतर श्रीलंकेतील तिरंगी वनडे मालिकेत भारत-अ संघाकडून खेळताना वैभवने २९ चेंडूत ९४ धावांची धडाकेबाज खेळी केल्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या भारतीय संघाचे सलामीवीर म्हणून संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन हे तिघे मुख्य दावेदार आहेत. टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघात या तिघांनीही चमक दाखवली होती.

जर संघ व्यवस्थापनाने सलामीवीर वैभवला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला, तर संजू किंवा अभिषेकला फलंदाजीच्या क्रमवारीत खाली जावे लागेल किंवा संघाबाहेर बसावे लागेल. श्रेयस चौथ्या, तर तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर येईल.

वेळ : सायंकाळी ६ वाजता

थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३ वाहिनी

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in