विश्वचषक हॉकी स्पर्धा (पुरुष) : भारताला आज अर्जेंटिनाविरुद्ध विजय अनिवार्य

पुरुषांच्या हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला सोमवारी होणाऱ्या दुसऱ्या फेरीतील अंतिम सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागणार आहे. या लढतीत भारतीय संघासाठी चुकीला माफी नसेल.
विश्वचषक हॉकी स्पर्धा (पुरुष) : भारताला आज अर्जेंटिनाविरुद्ध विजय अनिवार्य
Published on

ॲम्स्टेलवीन : पुरुषांच्या हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला सोमवारी होणाऱ्या दुसऱ्या फेरीतील अंतिम सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागणार आहे. या लढतीत भारतीय संघासाठी चुकीला माफी नसेल.

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे पुरुष आणि महिलांच्या हॉकी विश्वचषकाला प्रारंभ झाला. नेदरलँड्सविरुद्ध १-३ अशा झालेल्या पराभवामुळे भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले होते. मात्र, अर्जेंटिनाने इंग्लंडवर मिळवलेल्या विजयामुळे भारताच्या आशा तांत्रिकदृष्ट्या जिवंत राहिल्या आहेत. भारताचा हा सामना अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यानंतर होणाऱ्या नेदरलँड्स आणि इंग्लंड सामन्याच्या निकालावरही बरेच काही अवलंबून असेल.

नवीन विश्वचषक स्वरूपानुसार इ-गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. नेदरलँड्सने ६ गुणांसह आधीच अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे, इंग्लंड आणि अर्जेंटिना दोन सामन्यांनंतर प्रत्येकी ३ गुणांसह समान स्थितीत आहेत. भारताचे खाते अद्याप उघडलेले नसले तरी जर-तरच्या आधारे संघ शर्यतीत आहे. भारतासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे अर्जेंटिनाचा किमान दोन गोलच्या फरकाने पराभव करणे आणि नेदरलँड्सने इंग्लंडचा किमान तीन गोलच्या फरकाने पराभव करावा अशी अपेक्षा ठेवणे.

उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यातील गोल फरकात किमान चार गोलचा फरक असणे आवश्यक आहे.

भारताने अर्जेंटिनावर ३-१ असा विजय मिळवला, तर भारताचे ६ गोल होतील आणि ८ गोल स्वीकारलेले असतील. अशा स्थितीत इंग्लंडचा ०-२ असा पराभव झाल्यास त्यांचे ५ गोल होतील आणि ७ गोल स्वीकारलेले असतील, ज्यामुळे जास्त गोल केल्याच्या आधारे भारत पुढे जाऊ शकेल. मात्र हे आव्हान सोपे नाही, कारण अर्जेंटिनाने या वर्षाच्या सुरुवातीला राऊरकेला येथे झालेल्या 'एफआयएच' प्रो लीगमध्ये भारताचा ८-० आणि ४-२ असा पराभव केला होता.

भारतीय संघासाठी संधींचे गोलमध्ये रूपांतर करणे ही सर्वात मोठी चिंता आहे. अनुभवी मध्यरक्षक हार्दिक सिंगने स्पष्ट केले की, ९९ टक्के चांगला खेळ करूनही १ टक्क्याची चूक महागडू शकते. तसेच अर्जेंटिनाचा गोलरक्षक टोमास सँटियागोने भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग याला सर्वात मोठा धोका मानले असून, त्याच्या ड्रॅग-फ्लिकचा प्रतिकार करण्यासाठी विशेष तयारी केल्याचे सांगितले आहे. भारताला अर्जेंटिनाला मोठ्या फरकाने पराभूत करून इतर निकालांची वाट पहावी लागणार आहे.

महिलांचा नेदरलँड्सकडून पराभव

भारतीय महिला हॉकी संघाला नेदरलँड्सकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. भारताला आता ऑस्ट्रेलियाला नमवल्याशिवाय पर्याय नसेल. चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत बरोबरीत सुटल्याने भारताला अद्यापही आगेकूच करण्याची संधी आहे. भारतीय महिला संघाला आजवर एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही.

वेळ : सायंकाळी ६.१५ वाजता

logo
marathi.freepressjournal.in