सिराज, बुमरासमोर विंडीजचे लोटांगण; पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा या भारतीय वेगवान दुकलीसमोर पाहुण्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १६२ धावांवर कोसळला.
(Photo - FPJ)
(Photo - FPJ)
Published on

अहमदाबाद : मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा या भारतीय वेगवान दुकलीसमोर पाहुण्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १६२ धावांवर कोसळला. त्यानंतर अनुभवी के.एल. राहुलने नाबाद अर्धशतक झळकावत भारताला मजबुत स्थितीत नेले.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने १२१ धावांवर २ फलंदाज गमावले होते. अजूनही भारतीय संघ ४१ धावांनी पिछाडीवर आहे. मोहम्मद सिराज (४/४०) आणि जसप्रीत बुमरा (३/३२) यांनी पहिल्या दिवशी शानदार गोलंदाजी केली. पावसामुळे पहिल्या दिवशी काही षटके पडू शकली नाहीत.

राहुल आणि यशस्वी जयस्वाल या सलामीच्या जोडीने ६८ धावांची भागीदारी केली. ३६ धावा करून यशस्वी जयस्वाल बाद झाला. त्यानंतर राहुल आणि बी. साईसुदर्शन जोडी फार काळ मैदानात टिकली नाही. अवघ्या ७ धावा करून साईसुदर्शन माघारी परतला. मात्र तरीही पहिला दिवस भारताने गाजवला.

यशस्वी जयस्वालने संयमी फलंदाजी केली. त्याने ३७ चेंडू खेळल्यानंतर यशस्वीने पहिला चौकार लगावला. मात्र त्यानंतर यशस्वीने फटकेबाजी केली. त्याने पुढील १६ चेंडूंत आणखी ६ चौकार लगावले.

यशस्वीने ३६ चेंडूंत ४ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर यशस्वीने दोन्ही बाजूंनी फटकेबाजी केली. ५४ चेंडूंत ३६ धावा करताना त्याने ७ चौकार लगावले.

मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात जेडन सील्सच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक शाई होपकरवी झेल देत तो माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला साई सुदर्शन फार काळ मैदानात थांबू शकला नाही. राहुल सोबत दुसरी धाव घेताना तो एकदा गोंधळला. त्यानंतर लगेचच तो बाद झाला.

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारताना सुदर्शन बाद झाला. ऑफ स्पिनरच्या गोलंदाजीवर पुल फटका मारताना चेंडूचा अंदाज चुकला आणि त्याला माघारी परतावे लागले.

तत्पूर्वी, भारताच्या वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना आपल्या नियंत्रणात ठेवले. त्यामुळे पाहुणा संघ अवघ्या १६२ धावांवर सर्वबाद झाला. सिराजने लंचनंतर अप्रतिम इनस्विंग टाकत २४ धावांवर खेळणाऱ्या चेसला माघारी धाडले. यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने त्याचा झेल टिपला.

कुलदीप यादवने पहिल्या सत्रात यष्टीरक्षक शाई होपचा त्रिफळा उडवला. त्याने दुसरा बळी रिव्हर्स स्वीपवर जोमेल वॉरिकनला झेलबाद केले. कुलदीपने २५ धावा मोजत २ फलंदाज आपल्या सापळ्यात अडकवले.

वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला. एक बळी मिळवताना त्याने ९ धावा दिल्या. तो फारच उशिरा गोलंदाजीला आला. वेस्ट इंडिजच्या जस्टिन ग्रिव्हसने सर्वाधिक ३२ धावा केल्या. चेसने २४ आणि होपने २६ धावा केल्या. पण त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चार बळी घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचा कणा मोडला. पहिल्या दिवसानंतर सिराज म्हणाला की, बऱ्याच काळानंतर गवताच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना मला खूप आनंद झाला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने २-२ अशी बरोबरी साधली होती, त्या मालिकेतही सिराजने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्या कामगिरीनंतर तब्बल दोन महिन्यांनी त्याने पुन्हा जोरदार पुनरागमन करत ४० धावा देत ४ फलंदाजांना आपल्या सापळ्यात अडकवले. त्याच्या दमदार गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा डाव ४४.१ षटकांत १६२ धावांत आटोपला.

गवताची खेळपट्टी पाहून मला खूपच आनंद झाला. कारण भारतात कसोटी क्रिकेटमध्ये अशा खेळपट्ट्या फारशा मिळत नाहीत. बंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अशा खेळपट्टीवर मी खेळलो होतो, असे सिराजने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

सामन्यापूर्वी खेळपट्टीवर भरपूर गवत होते. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी थोडे गवत कापण्यात आले. पण तरीही वेगवान गोलंदाजाला पुरेशी मदत मिळाली.

वेस्ट इंडिजचा जोमेल वॉरिकन म्हणाला की, आम्ही सामन्यावर पकड मिळवू शकलो नाही. विशेषतः शाय होप आणि रोस्टन चेस यांनी भागीदारी केल्यानंतर आमचे फलंदाज झटपट बाद झाले. त्याचा फटका संघाला बसला.

सिराजने चेंडूचा उत्कृष्ट वापर केला. त्याने चेंडू अप्रतिम सीम केला. सकाळच्या सत्रात त्याने तीन बळी घेतले. वेस्ट इंडिजच्या ब्रँडन किंगला त्याने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर कर्णधार रोस्टन चेसलाही बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद केले.

चेसला बाद करताना टाकलेला चेंडू आश्चर्यकारक होता, असे सिराजने सांगितले.

सिराजने पहिल्या सत्रात तीन बळी घेतले. त्यानंतर आणखी एक बळी घेत ४ बळी आपल्या नावे केले. बुमरानेही लाल चेंडूवर आपली ताकद दाखवली. त्याने २ अप्रतिम यॉर्कर टाकून वेस्ट इंडिजला धडकी भरवली. बुमराने आपल्या १४ षटकांच्या स्पेलमध्ये ३ निर्धाव षटके फेकली. तसेच ४२ धावा मोजत ३ फलंदाजांना माघारी धाडले. या वेगवान दुकलीने ७ फलंदाजांना आपल्या सापळ्यात अडकवले.

राहुलचे नाबाद अर्धशतक

के.एल. राहुलने पहिल्याच दिवशी या कसोटी मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. तो ११४ चेंडूंत ५३ धावांवर खेळत आहे. आपल्या या अर्धशतकीय खेळीत त्याने ६ चौकार लगावले. भारताचा कर्णधार शुभमन गिल ४२ चेंडूंत नाबाद १८ धावांवर आहे. त्याने आपल्या १८ धावांच्या खेळीत एक चौकार लगावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in