श्रीचरणीमुळे विजयी श्रीगणेशा; यजमान जपानचा फडशा पाडून भारतीय महिलांची उपांत्य फेरीत धडक

डावखुरी फिरकीपटू एन. श्रीचरणीने (१० धावांत ४ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
श्रीचरणीमुळे विजयी श्रीगणेशा; यजमान जपानचा फडशा पाडून भारतीय महिलांची उपांत्य फेरीत धडक
श्रीचरणीमुळे विजयी श्रीगणेशा; यजमान जपानचा फडशा पाडून भारतीय महिलांची उपांत्य फेरीत धडक(Photo-X/@BCCIWomen)
Published on

नागोया : डावखुरी फिरकीपटू एन. श्रीचरणीने (१० धावांत ४ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. गतविजेत्या भारताने यजमान जपानचा ८ गडी व ९० चेंडू राखून धुव्वा उडवला. रविवारी रंगणाऱ्या उपांत्य लढतीत भारताची बांगलादेशशी गाठ पडेल.

विक्रमी आठव्यांदा टी-२० आशिया चषक उंचावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ आता आशियाई स्पर्धेत आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या महिला संघाने २०२३मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. महिलांच्या विभागात एकूण आठ संघ सहभागी झाले असून थेट उपांत्यपूर्व फेरीपासूनच सामने खेळवले जात आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांनी उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला आहे.

दरम्यान, शुक्रवारी प्रथम फलंदाजी करताना जपानचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत अवघ्या ५७ धावांत तंबूत परतला. श्रीचरणीने १० धावांत ४ बळी घेत टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. तिला शफाली वर्माने १३ धावांत २ बळी घेत उत्तम साथ दिली. जपानकडून अयाका काटो-स्टाफोर्ड हिने सर्वाधिक २५ धावा केल्या, तर सलामीवीर हरुना इवासाकी हिने १० धावांचे योगदान दिले. जपानने डावात अवघे ३ चौकार लगावले.

विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारताने अवघ्या ५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. शफालीने १५ चेंडूंत नाबाद ४० धावांची धडाकेबाज खेळी केली. तिला रिचा घोष हिने ६ चेंडूंत १२ धावा करत मोलाची साथ दिली. जपानकडून गुणालन कमलिनी (०) आणि भारती फुलमाळी (६) यांचे बळी घेण्यात आले.

आता २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना श्रीलंका संघाशी होईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in