यास्तिकाच्या शतकामुळे महिला संघ सुस्थितीत; दुसरा डाव ३४१ धावांवर घोषित; इंग्लंडपुढे ४५७ धावांचे लक्ष्य

यास्तिका भाटिया ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
यास्तिकाच्या शतकामुळे महिला संघ सुस्थितीत; दुसरा डाव ३४१ धावांवर घोषित; इंग्लंडपुढे ४५७ धावांचे लक्ष्य
यास्तिकाच्या शतकामुळे महिला संघ सुस्थितीत; दुसरा डाव ३४१ धावांवर घोषित; इंग्लंडपुढे ४५७ धावांचे लक्ष्यX
Published on

लॉर्ड्स : यास्तिका भाटिया ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्या या शानदार शतकानंतर भारताने एकमेव कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रविवारी चहापानाच्या वेळेस आपला दुसरा डाव ७ बाद ३४१ धावांवर घोषित केला. यामुळे यजमान इंग्लंडसमोर विजयासाठी ४५७ धावांचे आव्हान उभे राहिले आहे.

या ऐतिहासिक मैदानावर होणाऱ्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात यास्तिका भाटियाने १५८ चेंडूत ११३ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तिच्या या खेळीनंतर ऋचा घोषने ५२ चेंडूत ५० धावांचे वेगवान अर्धशतक झळकावत सामन्यावरील भारताचे वर्चस्व अधिक मजबूत केले. इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन हिने उत्कृष्ट गोलंदाजी करत ५ बळी घेतले. आता सामना वाचवण्यासाठी इंग्लंडच्या संघाला मोठी धडपड करावी लागणार आहे.

यापूर्वी भारताने पहिल्या डावात २८५ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव १७० धावांवर गुंडाळून सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताने तीन विकेट गमावल्या तरी चहापानापर्यंत ४ बाद २५० धावा करत भारताने आपली स्थिती मजबूत केली होती. स्मृती मानधना ७० धावांवर खेळत असताना लॉरेन बेलच्या गोलंदाजीवर लेग-साइडला झेलबाद झाली. वेगवान गोलंदाज बेलने उत्कृष्ट कामगिरी करत मानधना पाठोपाठ जेमिमाह रॉड्रिग्जला अवघ्या ३ धावांवर बाद केले. यास्तिका भाटियाने ३९ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती. तिने फिरकीपटूंविरुद्ध पावलांचा केलेला सुरेख वापर आणि मारलेले सरळ ड्राईव्हज हे खेळीचे मुख्य वैशिष्ट्य राहिले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in