
लंडन : भारतीय महिला संघाला शुक्रवारी इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्याची संधी आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना शुक्रवारी ओव्हल स्टेडियमवर रंगणार असून भारतीय संघ या मालिकेत २-० असा आघाडीवर आहे. त्यामुळे शुक्रवारी लढत जिंकल्यास भारतीय महिलांना इंग्लंडमध्ये प्रथमच एखादी टी-२० मालिका जिंकता येईल.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात उभय संघांत ५ टी-२० सामन्यांनंतर १६ जुलैपासून ३ एकदिवसीय लढतीही होणार आहेत. भारताने मे महिन्यात तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिका व श्रीलंका यांना नमवले. त्या मालिकेतील बहुतांश खेळाडूंना इंग्लंडविरुद्धही संघात कायम राखले आहे. उभय संघांतील या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने उपकर्णधार स्मृती मानधनाच्या शतकाच्या बळावर बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या लढतीत मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज व अमनजोत कौर यांनी अर्धशतके झळकावल्यामुळे महिला संघाने सलग दुसरा विजय नोंदवला.
आता शुक्रवारी तिसरी लढत जिंकल्यास भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेईल. २००६मध्ये भारतीय महिलांनी इंग्लंडमध्ये एकमेव टी-२० सामना झाला होता. त्यावेळी ती लढत आपण जिंकली होती. मात्र एखाद्या टी-२० मालिकेत भारताने इंग्लंडला आजवर एकदाही नमवलेले नाही. उर्वरित दोन सामन्यांवर विसंबून राहण्यापेक्षा शुक्रवारीच भारतीय संघाने मोहीम फत्ते केली पाहिजे. भारतीय संघाची फलंदाजीत स्मृती, जेमिमा, हरमनप्रीत, अमनजोत यांच्यावर भिस्त असेल.
दुसरीकडे इंग्लंडची कर्णधार नॅट शीव्हर ब्रंट स्नायूंच्या दुखापतीमुळे या लढतीला मुकणार आहे. अशा स्थितीत त्यांच्यावरील दडपण आणखी वाढले असून टॅमी ब्युमाँटकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. इंग्लंडला एमी जोन्स, सोफी एक्केलस्टोन व एलिस काप्सी यांच्याकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.
भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, श्री चरिणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सतघरे.
वेळ : रात्री ११ वाजल्यापासून, थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३