तिरंदाजी विश्वचषक स्टेज-३मध्ये भारताने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावून पदकांचे खाते उघडले. कम्पाउंड मिक्स्ड टीम स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा जोडीने फ्रान्सच्या टीमला १५२-१४९च्या फरकाने नमवून सुवर्णपदक जिंकले. कम्पाउंड महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ज्योती सुरेखाचा पराभव झाल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
कम्पाउंड मिक्स्ड टीम फायनलच्या पहिल्या फेरीत अभिषेक आणि ज्योती यांनी आपले चारही शॉट निशाण्यावर अचूक मारले. दोन शॉट बुल्स आयवर लागले. दोन शॉट १० गुणांच्या घेऱ्यात लागले. त्यामुळे भारताला पहिल्या फेरीतच पूर्ण ४० गुण मिळाले. फ्रान्सच्या टीमला ३७ गुण मिळविता आले.
दुसऱ्या फेरीत भारतीय जोडीने ३६ गुण मिळविले. तर फ्रान्सच्या जोडीने ३८ गुण मिळविले. तिसऱ्या फेरीत दोन्ही संघांची ३९-३९ अशी बरोबरी झाली. चौथ्या आणि अंतिम फेरीत अभिषेक-ज्योतीने ३७ गुण मिळवित सामना जिंकला.
ज्योतीने महिला एकेरीत ब्रिटनच्या एल्ला गिब्सनविरुद्धच्या लढतीत १४८-१४८ अशी बरोबरी साधण्यात यश मिळविल्यानंतर झालेल्या शूटऑफमध्ये ज्योतीने १० गुण घेतल्यानंतर एल्लानेही १० गुण घेतले; परंतु तिचा निशाना बुल्स आयच्या अधिक जवळ लागला.