
बेकनहॅम : इंग्लंडमधील वातावरणात सातत्यपूर्ण खेळ महत्त्वाचा असल्याचे मत भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी व्यक्त केले. २० जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी संघाला लाल चेंडूवरील सरावाला पुरेसा वेळ न मिळाल्याने मॉर्केल यांनी नाराजी व्यक्त केली.
नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
इंग्लंडमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. इंग्लंडच्या वातावरणात खेळताना सरावात सातत्य असणे गरजेचे आहे. परंतु भारतीय संघाला लाल चेंडूवरील सरावाला पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे मॉर्केल म्हणाले. भारतीय संघाच्या सराव सत्रादरम्यान ते बोलत होते.
भारताकडे विविध प्रकारचे गोलंदाज आहेत. त्यांच्या गोलंदाजीत विविधता आहे. मूलभूत गोष्टींसह ते आपल्यातील विविधतेने चांगली कामगिरी करू शकतात, असा आशावाद मॉर्केल यांनी व्यक्त केला.
जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीडनी येथे भारतीय संघाने लाल रंगातील चेंडूवर अखेरचा सामना खेळला आहे. यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शनसह सध्याच्या संघातील काही खेळाडू प्रथमच इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी जाणार आहेत.
सराव सामन्यात भारतीय संघाने चांगली सुरुवात केली आहे, याचा आनंद आहे. लाल चेंडूमुळे थोडी काळजी वाटत होती, पण गेल्या तीन दिवसांपासून खेळाडूंनी चांगली तयारी दाखवली आहे, असे मॉर्केल म्हणाले.
सराव सत्रातील परिस्थिती जलद गोलंदाजांना अनुकूल
गोलंदाजांसाठी सध्या सुरू असलेले सराव सत्र फायदेशीर ठरत आहे. वातावरण वेगवान गोलंदाजांना पूरक असल्याचेही मॉर्केल यांनी नमूद केले. गेल्या दोन दिवसांत सराव सत्रातील परिस्थिती जलद गोलंदाजांना अनुकूल होती. इंग्लंडमधील खेळपट्टीवर सराव करणे महत्त्वाचे आहे. या सराव सत्रातील सकारात्मक गोष्टींमुळे पुढील आव्हानांसाठी तयारी करता येईल, असे मॉर्केल म्हणाले.