
नवी दिल्ली : मलेशिया येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने सलग चौथा विजय नोंदवताना थाटात उपांत्य फेरीत धडक मारली. सलामीवीर त्रिशा घोंगडीच्या ५९ चेंडूंतील नाबाद ११० धावांच्या शतकी खेळीमुळे भारतीय युवतींच्या संघाने स्कॉटलंडचा १५० धावांनी फडशा पाडला.
सुपर-सिक्स फेरीतील पहिल्या गटाच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत १ बाद २०८ धावांचा डोंगर उभारला. त्रिशाने स्पर्धेतील पहिले शतक झळकावण्याचा मान मिळवताना १३ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली. त्रिशा आणि जी कामलिनी यांनी ८१ चेंडूंत १४७ धावांची सलामी नोंदवली. कामलिनीने ४२ चेंडूंत ५१ धावा केल्या. त्यानंतर सानिका चाळकेच्या साथीने त्रिशाने संघाला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. सानिका २९ धावांवर नाबाद राहिली. मैसीने एकमेव बळी मिळवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत ५८ धावांतच गारद झाला. डावखुरी फिरकीपटू आयुषी शुक्लाने ४ बळी मिळवले. तिला लेगस्पिनर त्रिशाने ३ बळी घेत सुरेख साथ दिली. त्यामुळे भारताने आगेकूच केली.