हार्दिकपेक्षा भारतीय खेळाडूंना सूर्यकुमारवर अधिक विश्वास?

भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा नवा कर्णधार निवडताना प्रशिक्षक गौतम गंभीर, अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यात बरीच चर्चा झाली. दोन दिवस झालेल्या बैठकांनंतर अखेर सूर्यकुमार यादवच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
हार्दिकपेक्षा भारतीय खेळाडूंना सूर्यकुमारवर अधिक विश्वास?
X
Published on

मुंबई : भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा नवा कर्णधार निवडताना प्रशिक्षक गौतम गंभीर, अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यात बरीच चर्चा झाली. दोन दिवस झालेल्या बैठकांनंतर अखेर सूर्यकुमार यादवच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यासाठी खेळाडूंचा सूर्यकुमारवरील विश्वास आणि हार्दिक पंड्याच्या तंदुरुस्तीची चिंता ही दोन प्रमुख कारणे ठरल्याची माहिती आहे.

या महिन्याअखेरीस होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यातील तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताच्या नेतृत्वाची धुरा सूर्यकुमारकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिकच्या तंदुरुस्तीची निवड समितीला सर्वाधिक चिंता होती. तसेच वैयक्तिक कारणामुळे आपण श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नसल्याचे हार्दिकने कळवल्याने निवड समितीच्या चिंतेत भर पडली. ‘बीसीसीआय’ला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खेळाडूंचा हार्दिकपेक्षा सूर्यकुमारवर अधिक विश्वास आहे. ते सूर्यकुमारशी अधिक मोकळेपणाने बोलतात. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत कर्णधारपद भूषवताना सूर्यकुमारने सर्व राखीव खेळाडूंशी संवाद साधून त्यांना संधीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच मालिका सोडून घरी परतण्याच्या तयारीत असलेल्या इशान किशनची मनधरणी करण्याचाही सूर्यकुमारने प्रयत्न केला होता. ही बाब सर्व खेळाडूंना रुचली. त्यामुळे ३३ वर्षांचा असूनही सूर्यकुमार कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे निवड समितीला वाटले.

दरम्यान, श्रीलंका दौरा २६ जुलैपासून सुरू होणार असून भारतीय संघ येथे प्रत्येकी ३ टी-२० व ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांचा एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच सूर्यकुमार, हार्दिक व रवींद्र जडेजाही एकदिवसीय संघात नाही.

logo
marathi.freepressjournal.in