लंडन : इंग्लंडमधील द हंड्रेड या लीगसाठी गुरुवारी खेळाडूंची लिलावप्रकिया पार पडली. त्यामध्ये आयपीएलमध्ये मालकी हक्क असलेले अनेक संघ सहभागी आहेत. यांपैकीच काव्या मरन हिच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स संघाने पाकिस्तानच्या अबरार अहमद खेळाडूवर बोली लावून त्याला संघात सहभागी केले. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध बिघडल्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाहीत. तसेच गतवर्षी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांतील संबंध आणखी बिघडले. त्यामुळेच आयसीसीशी २०२७पर्यंत केलेल्या करारानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणतेही सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत.
त्यामुळे टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे झाला. तसेच पाकिस्तान त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. आशिया चषकापासून भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू झालेला नवा वाद आणि बांगलादेशची विश्वचषकातून झालेली गच्छंती यामुळे हे प्रकरण अधिक तापले आहे.
यानंतर अबुधाबी येथे आयपीएल २०२६च्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात कोलकाता संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला ९.२० कोटी इतकी बोली लावून खरेदी केले. बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर सुरू असणाऱ्या अत्याचाराविरोधात कोणत्याही संघांनी बांगलादेशी खेळाडूंवर बोली लावू नये, अशी मागणी चाहत्यांनी केली. ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये बंदी आहे, तशीच बांगलादेशवरही ती घालण्यात यावी, असाही जोर त्यांनी धरला. कारण आयपीएलमधील अन्य कोणत्याही संघात एकही बांगलादेशचा खेळाडू नाही. परिणामी बीसीसीआयला आठवडाभरातच याची दखल घ्यावी लागली व त्यांनी रहमानला संघातून काढण्याचे आदेश कोलकाताला दिले. त्याबदल्यात त्यांना अन्य खेळाडू निवडण्याची मुभा देण्यात आली.
आता इंग्लंडमधील द हंड्रेड लीगमध्ये आयपीएलसारखेच एमआय लंडन (मुंबई इंडियन्स), सनरायजर्स लीड्स (सनरायजर्स हैदराबाद), मँचेस्टर सुपर जायंट्स (लखनऊ सुपर जायंट्स) असे संघ सहभागी झाले आहेत. त्यापैकी सनरायजर्स लीड्स संघाने पाकिस्तानी खेळाडूवर लिलावात बोली लावली.
२.३४ कोटी रुपयांत तो करारबद्ध झाला. अन्य भारतीय मालकीच्या संघांनी पाकिस्तान खेळाडूंना घेतलेले नाही. त्यामुळेच आता अबरार लीड्स संघात खेळणार की नाही, याविषयी चर्चा सुरू आहे. तसेच अनेक चाहते सनरायजर्स लीड्स संघावर टीकाही करत आहेत. २१ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत या स्पर्धेचे सहावे पर्व रंगणार आहे. या स्पर्धेत विदेशातील अनेक तारांकित खेळाडू सहभागी होतात. आयपीएलनंतर ही स्पर्धा होते.