भारतीय महिला सलग आठव्यांदा अंतिम फेरीत; अष्टपैलु शफालीची दमदार कामगीरी

सिल्हेट क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली.
भारतीय महिला सलग आठव्यांदा अंतिम फेरीत; अष्टपैलु शफालीची दमदार कामगीरी

सलामीवीर शफाली वर्माने (२८ चेंडूंत ४२ धावा आणि १ बळी) दाखवलेली अष्टपैलू चमक आणि फिरकीपटूंनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात थायलंडचा ७४ धावांनी धुव्वा उडवला. आता शनिवारी होणाऱ्या अंतिम लढतीत भारताची श्रीलंकेशी गाठ पडेल.

सिल्हेट क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली. शफालीने पाच चौकार व एक षटकार झळकावला. कर्णधार हरमनप्रीत कौर (३० चेंडूंत ३६) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (२६ चेंडूंत २७) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यानंतर दीप्ती शर्मा (३/७) आणि राजेश्वरी गायकवाड (२/१०) यांच्या फिरकीने कमाल केल्यामुळे थायलंडला २० षटकांत ९ बाद ७४ धावाच करता आल्या. शफालीनेसुद्धा एक बळी मिळवला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर अवघ्या एका धावेच्या फरकाने विजय मिळवला. श्रीलंकेने ६ बाद १२२ धावा केल्यानंतर पाकिस्तानला २० षटकांत ६ बाद १२१ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, भारताने सहा वेळा आशिया चषक उंचावला असून, शनिवारी श्रीलंकेला नमवून ते सातव्यांदा असा पराक्रम करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in